ओबीसी नेते राष्ट्रवादी सोडून जात आहेत; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
By कमलेश वानखेडे | Updated: June 23, 2023 18:46 IST2023-06-23T18:46:11+5:302023-06-23T18:46:46+5:30
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

ओबीसी नेते राष्ट्रवादी सोडून जात आहेत; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
कमलेश वानखेडे
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विरोधी आहे. त्यामुळेच ओबीसी नेते राष्ट्रवादी सोडून जात आहे. म्हणून त्यांच्या पक्षात ओबीसी प्रदेशाध्यक्ष असावा, अशी मागणी पुढे आली आहे. आता त्यांना महाराष्ट्रात काहीही वाव नाही. त्यांच्याकडे असलेले मोठे ओबीसी नेते आता भाजपमध्ये येत आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा महानाट्य होईल आणि त्याचा शेवट शरद पवार करतील, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
बावनकुळे म्हणाले, विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही. एकवटेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली काय सांभाळणार असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांनी कितीही वज्रमूठ बांधली तरीही मोदी जगातले सर्वोत्कृष्ट नेते म्हणून समोर आले आहेत. २०२४ मध्ये एनडीए ४०० हून अधिका जागांवर विजय मिळविणार ऐवढी ताकद पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात तयार झाली आहे. भारतातील प्रत्येक नागरिक मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करेल. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगामध्ये भारत मांडला आहे आणि आजसुद्धा नरेंद्र मोदी अमेरिकेत भारताला मांडत आहेत.
- आदित्य ठाकरेंच्या तक्रारीची चौकशी व्हावी
महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केला. मविआ सरकारच्या काळात कोविड घोटाळ्यासह एवढे काळे धंदे केले आहेत की, तक्रारीच्या आधारे चौकशी झाली असेल. अशा भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी तक्रार केली असेल तर त्याचीही चौकशी झाली पाहिजे.