राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विद्यार्थ्यांविना पोरकी
By Admin | Updated: May 28, 2014 00:52 IST2014-05-28T00:52:23+5:302014-05-28T00:52:23+5:30
‘झाड झडूले शस्त्र बनेंगे फूल बनेगी सेना..’ अशा शब्दात राष्ट्रप्रेमाचा बिगुल फुंकणार्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून समाज विकासाचा एक नवीन आदर्श घडविला.

राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विद्यार्थ्यांविना पोरकी
नागपूर : ‘झाड झडूले शस्त्र बनेंगे फूल बनेगी सेना..’ अशा शब्दात राष्ट्रप्रेमाचा बिगुल फुंकणार्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून समाज विकासाचा एक नवीन आदर्श घडविला. त्यांच्या याच जाज्वल्य विचारांचा समाजाला पुढेही लाभ व्हावा, या उदात्त उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मोठा गाजावाजा करीत राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विभाग सुरू करण्यात आले. परंतु दोन वर्षे लोटूनही या विभागाला विद्यार्थीच उपलब्ध होत नसल्याने राष्ट्रसंतांची विचारधाराच जणू पोरकी झाली आहे. विदर्भ ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी. त्या उद्देशाने २00५ मध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर चार वर्षांनी २00९ साली राष्ट्रसंतांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तत्कालीन कुलगुरू एस.एन. पठाण यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी नागपूर विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विभाग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यासाठी दोन कोटी रुपयेसुद्धा उपलब्ध करून दिले. या निधीतून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात आला. विद्यापीठातील तुकडोजी विचारधारा विभागासाठी डॉ. अक्षयकुमार काळे आणि श्री गुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर रक्षक यांनी परिश्रमपूर्वक अभ्यासक्रम तयार केला. २0१0-११ मध्ये विचारधारा विभागाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. सध्या हा विभाग मराठी विभागांतर्गत असून, डॉ. अक्षयकुमार काळे विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार पाहत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विभागात सध्या बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रम सुरू आहे. शैक्षणिक सत्राचे हे दुसरे वर्ष आहे. परंतु या विभागाला अजूनपर्यंत विद्यार्थीच उपलब्ध झालेले नाही. परिणामी हा विभाग केवळ कागदावरच उरला आहे. यासंदर्भात विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेसाठी बी.ए.चा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. परंतु विद्यापीठातील संलग्नित एकही महाविद्यालय हा विभाग सुरू करायला तयार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अधिव्याख्यातांचा खर्च कोण भागविणार हा आहे. तसेच एम.एम. अभ्यासक्रमासाठीसुद्धा काही अटी घालण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी विभागाकडे पाठ फिरविली आहे. एकूणच विद्यापीठातील अधिकार्यांच्या उदासीनतेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा विभागाच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)