लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नीट परीक्षेत वेळ कमी मिळाल्याच्या तक्रारीच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ला नोटीस बजावली आहे. १६ जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नीटच्या या गोंधळाविषयी नागपूरची मृण्मयी प्रतीक पाटील या विद्यार्थिनीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. एनटीएतर्फे यावर्षी यावर्षी ४ मे रोजी नीटची परीक्षा घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृण्मयीने अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली होती. याचिकेनुसार परीक्षेदरम्यान केंद्रावर झालेल्या त्रुटीमुळे परीक्षार्थीना ठराविक वेळेपेक्षा २० मिनिटे कमी मिळाले होते.
याबाबत मृण्मयीने १२ मे रोजी एनटीएकडे तक्रारही केली होती. त्यावर १९ मे रोजी प्रतिक्रिया देताना योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन एनटीएने दिले होते. मात्र, १० दिवस लोटल्यानंतरही काहीच कार्यवाही न झाल्याने मृण्मयीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. अनिल किलोर व न्या. प्रवीण पाटील यांनी मंगळवारी सुनावणी घेतली.
मध्य प्रदेश न्यायालयात 'नीट'बाबत ३० याचिकाविशेष म्हणजे नीट परीक्षेत दरवर्षी होणाऱ्या गोंधळाचे सत्र यंदासुद्धा कायम होते. यावर्षी झालेल्या नीट परीक्षेच्या अनियमिततेबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयात ३० च्या जवळपास याचिका दाखल आहेत. न्यायालयाने तेथील काही परीक्षा केंद्रांच्या निकालावर स्थगिती दिली आहे. दुसरीकडे मद्रास उच्च न्यायालयातही नीट परीक्षेबाबत १० च्या वर याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. एनटीएच्या अहवालानंतर या याचिका रद्द करण्यात आल्या.
न्यायालयाने एनटीएला मृण्मयीच्या १२ मे रोजीच्या तक्रारीवर चौकशी करून नीटचा निकाल घोषित होण्यापूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेवर आता १६ जून रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांकडून अॅड. आनंद ठाकरे व अॅड. मंदार देशपांडे यांनी बाजू मांडली.