राष्ट्रीय सुरक्षा दिवस; शून्य अपघाताचे ध्येय गाठणे सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 07:00 AM2020-03-04T07:00:00+5:302020-03-04T07:00:02+5:30

राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहांतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. या माध्यमातून अपघाताचे ध्येय गाठणे सोपे आहे.

National Security Day; Easy to achieve zero accident goals | राष्ट्रीय सुरक्षा दिवस; शून्य अपघाताचे ध्येय गाठणे सोपे

राष्ट्रीय सुरक्षा दिवस; शून्य अपघाताचे ध्येय गाठणे सोपे

googlenewsNext
ठळक मुद्देकारखान्यांमध्ये सुरक्षिततेसाठी जनजागृती आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहांतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. या माध्यमातून अपघाताचे ध्येय गाठणे सोपे आहे.
कारखान्यांशी निगडित विविध बाबींपैकी ‘कामगारांची सुरक्षितता’ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अपघात कोणताही असो, तो दु:ख देणाराच आहे. या अपघातरूपी दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान बुद्ध यांचा ‘आर्य अष्टंगिक मार्ग’ आहे. हा मार्ग सुरक्षिततेकडे नेणारा आहे. कारखाना अपघातमुक्त असावा, अशी कारखानदारांची भूमिका असणे, कारखान्याची दोषमुक्त यंत्रसामग्री, जागरूक यंत्रणा, सुरक्षा धोरण निश्चित करणे, यंत्र अथवा प्रक्रियेपासून काहीही इजा होणार नाही, हा समज काढून टाकणे आवश्यक आहे.
यंत्र, रसायनांचे धोकादायक दृष्टिकोन ठेवून काम करणे, त्या वस्तुस्थितीची सतत जाणीव ठेवणे म्हणजे सम्यक दृष्टी आहे. खोटे बोलणे, शिवीगाळ करणे, कठोर बोलणे, व्यर्थ बडबड या बाबी कारखान्यातील वातावरण अस्थिर, असुरक्षित करतात. कारखानदाराने धोकादायक स्थितीची माहिती देणे, व्यवस्थापन, कामगारांत मित्रत्वाचे संभाषण, वैचारिक देवाणघेवाण ही कारखान्यात सुरक्षिततेचे वातावरण राहण्यास मदत करते. इतरांना आपल्यामुळे त्रास, इजा होईल अशा वागण्यापासून स्वत:ला अलिप्त ठेवणे, मालमत्ता अथवा यंत्रसाग्रीची हानी होईल, अशा कृतीपासून दूर राहणे, शॉर्टकट पद्धती न वापरता निर्धारित कार्यप्रणालीचा वापर करणे, व्यवस्थापनाने सुरक्षा कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सतत प्रयत्नशील राहणे, हा सम्यक कर्मान्त आहे. वेळ, श्रम वाचविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने यंत्राच्या हाताळणीपासून कामगारांनी दूर राहणे आवश्यक आहे. कारखानदाराने सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून केवळ नफा वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवणे धोकादायक आहे.

राष्ट्रीय संपत्तीचे जतन संवर्धन
कारखान्यात काम करताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी शूज, गमबूट, जॅकेट, टोपी अशी सुरक्षिततेची साधने पुरविली जातात. त्यांचा वापर कसा करायचा हेही प्रात्यक्षिकांसह दाखविले जाते, तरीसुद्धा ओव्हर स्मार्टपणामुळे अपघात होण्याची संख्या काही कमी नाही. कामगारांना कामासंबंधी प्रशिक्षित केलेले असते. मंत्रालयात लागलेली आग, त्यात गमवावा लागलेला जीव, राष्ट्रध्वजाला धक्का लागू नये, म्हणून कर्मचाऱ्यांनी केलेला प्रयत्न; मात्र हेळसांडपणा, हलगर्जीपणा करून केवळ स्वत:चे, संस्थेचे, कुटुंबाचेच नव्हे तर राष्ट्राचेसुद्धा नुकसान होते, याचा विसर पडता कामा नये. राष्ट्रीय संपत्तीचे जतन, संवर्धन महत्त्वाचे आहे..

सुरक्षेबाबत आचरण गरजेचे
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाबाबत सर्व कामगारांना शपथ दिली जाते. ‘मी माझा देश मोठा करीन. माझ्याकडून कोणताही, कसल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. मी माझे काम उच्च लेखून कसल्याही प्रकारची हेळसांड न करता लक्षपूर्वक करीन आणि स्वत:बरोबर इतरांच्या जीवितांची दक्षता घेईन. अशी शपथ फक्त नावापुरती नको. तिचे आचरण केले तर अनेक अपघात टळणार आहेत शिवाय असंघटित कामगारांचे जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. तरच समृद्ध राष्ट्रनिर्माण होईल, हे खरेच आहे.

सुरक्षितता जोपासणे आवश्यक
सचोटीने कारखाना चालविणे आवश्यक आहे. जनजागृती, प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था, नियमांची वारंवार उजळणी, संयंत्रांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. कामावर असताना अमली पदार्थांचे सेवन आपली सतर्कता नष्ट करते. कामाच्या ठिकाणी सभोवतालच्या असुरक्षित परिस्थितीबाबत जागरूक असल्यास अपघात टाळता येऊ शकतात व त्यातूनच सुरक्षितता जोपासली जाते.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, एमआयए हिंगणा असोसिएशन.

 

 

Web Title: National Security Day; Easy to achieve zero accident goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग