नागपूरकर पुत्राचा राजधानीत गौरव
By Admin | Updated: August 23, 2014 03:09 IST2014-08-23T03:09:17+5:302014-08-23T03:09:17+5:30
नागपुरात जन्म झालेल्या डीआयजी रामचंद्र जांभोळकर यांना देशाच्या स्वातंत्र्यदिनी उल्लेखनीय कार्यासाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले.

नागपूरकर पुत्राचा राजधानीत गौरव
विहंग सालगट नागपूर
नागपुरात जन्म झालेल्या डीआयजी रामचंद्र जांभोळकर यांना देशाच्या स्वातंत्र्यदिनी उल्लेखनीय कार्यासाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. माऊंट आबू येथील सीआरपीएफच्या इंटरनल सिक्युरिटी अकादमीत डीआयजी पदावर असणाऱ्या जांभोळकर यांना त्यांच्या साहसी कार्यासाठी आतापर्यंत अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.
युवा वर्गासाठी प्रेरणा ठरलेले जांभोळकर यांनी केवळ नागपूरचेच नाव उंचावले नसून देशाच्या शत्रूंपासून ते आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठीही तळहातावर जीव घेऊन कार्य करीत आहेत. याप्रसंगी लोकमततर्फे त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. ४ फेब्रुवारी १९९१ मध्ये सीआरपीएफमध्ये गॅझेटेड आॅफिसर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
२३ वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात जांभोळकरांनी अनेकदा दहशतवाद्यांशीही दोन हात केले. ते आतापर्यंत आसाम, श्रीनगर, इम्फाल आणि देशाच्या अनेक भागात तैनात राहिले आहेत. प्रतिनियुक्तीत असताना एनएसजीत कार्य करताना त्यांनी देशातील अनेक दिग्गज नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा यशस्वीपणे दिली.
डीआयजी जांभोळकर यांना आतापर्यंत गोल्डन डिस्क (वन स्टार), आंतरिक सुरक्षा सेवा मेडल आणि यूएन अँड फॉरेन सर्व्हिस मेडल प्राप्त झाले आहे. त्यांना जम्मू - काश्मीर आणि उत्तरपूर्व क्षेत्रात सेवा करताना विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
जांभोळकर यांचे प्रत्येक क्रीडा प्रकारावर विशेष प्रेम आहे. ते सातत्याने माऊंट अबूच्या स्पोटर््स क्लब महोत्सवात सहभागी होतात आणि क्लबचे नेतृत्वही करतात. आरोग्याप्रति ते जागरूक आहेत. प्रशिक्षणादरम्यान अनेकदा आपल्या सहकाऱ्यांना ते आरोग्य राखण्यासाठी सूचनाही करीत असतात.
नागपूरची नेहमीच आठवण येते
डीआयजी जांभोळकर यांचे प्राथमिक शिक्षण बिशप कॉटन स्कूल येथे झाले. त्यानंतर हिस्लॉप महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. आजही नागपूरचा कानाकोपरा आणि तेथे घालविलेले क्षण मला आठवतात, असे ते म्हणाले. आईला भेटण्यासाठी मी अनेकदा नागपुरात येतो, असे ते म्हणाले.
दोन वेळा ‘बेस्ट आॅपरेशन बटालियन’
जांभोळकर आसाममध्ये दोन वर्षे बटालियन कमांडट राहिले आहेत. २००९ आणि २०१० साली त्यांच्या बटालियनला ‘बेस्ट आॅपरेशन बटालियन’ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळणे प्रतिष्ठेचे मानले जाते.