देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून नागपूरचे आयटीआय स्मार्ट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:32 IST2018-02-01T23:29:57+5:302018-02-01T23:32:01+5:30
मिहानसह सर्व उद्योगांना आवश्यक व उद्योजकांच्या गरजेनुसार तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासासोबतच नागपूर येथील आयटीआयचा देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट संस्था म्हणून विकास करण्यात येणार आहे. या आयटीआयच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून नागपूरचे आयटीआय स्मार्ट करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानसह सर्व उद्योगांना आवश्यक व उद्योजकांच्या गरजेनुसार तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विकासासोबतच नागपूर येथील आयटीआयचा देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट संस्था म्हणून विकास करण्यात येणार आहे. या आयटीआयच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा १५ दिवसात सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांसह विविध विभागांचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक चंद्रकांत निनाळे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व प्राचार्य उपस्थित होते.
नागपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे असलेल्या १९ एकर जागेवर अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम करून तसेच विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध व्हावे या दृष्टीने या संस्थेचा विकास करण्यात येईल. तसेच देशातील सर्वोत्कृष्ट व स्मार्ट आयटीआय करण्यात येणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने २५ नवीन अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव असून यामध्ये नागपूर येथे १३ नवीन तुकड्या राहणार आहेत. या परिसराचा विकास करताना ग्रीन बिल्डिंग, अत्याधुनिक यंत्रसामुग्री व उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मार्ट नागपूर आयटीआयचे सादरीकरण दाखविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण द्या
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४५ हजार ९३८ शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी विमा उतरविला असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसानी संदर्भातील अनुदान देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिल्यात. तसेच वैयक्तिक पीक विमा योजनेतील अंमलबजावणी संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी कृषिमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. यावेळी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, लीड बँक व्यवस्थापक अयुब खान, जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके उपस्थित होते.