नागपूर विद्यापीठ : ‘एमएसएफ’ची सुरक्षाव्यवस्था काढून घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:49 IST2019-02-12T00:48:29+5:302019-02-12T00:49:41+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’वर (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) आहे. मात्र विद्यापीठात आंदोलनादरम्यान होणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळे ही सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. यासंदर्भात कुलगुरूडॉ. सिद्धार्थविनायक काणे हे लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर विद्यापीठ : ‘एमएसएफ’ची सुरक्षाव्यवस्था काढून घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’वर (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) आहे. मात्र विद्यापीठात आंदोलनादरम्यान होणाऱ्या वादग्रस्त घटनांमुळे ही सुरक्षाव्यवस्था काढून घेण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे. यासंदर्भात कुलगुरूडॉ. सिद्धार्थविनायक काणे हे लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील आठवड्यात ‘अभाविप’च्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ता मुख्य प्रवेशद्वार तोडून आत शिरले व प्रशासकीय इमारतीत तोडफोड केली. या घटनेनंतर विद्यापीठातील ‘एमएसएफ’च्या अधिकाऱ्यांमार्फत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. काही महिन्यांअगोदर ‘एनएसयूआय’चे तीन डझनांहून अधिक कार्यकर्ते विद्यापीठात शिरले होते व रात्रभर आंदोलन केले होते. ‘एमएसएफ’च्या सुरक्षाव्यवस्थेत वारंवार त्रुटी दिसून येत आहेत. यंदा तर केवळ २० कार्यकर्ते असतानादेखील सुरक्षारक्षक त्यांच्यावर नियंत्रण आणू शकले नाहीत. ही बाब विद्यापीठाने गंभीरतेने घेतली असून, सुरक्षा एजन्सी बदलण्याचा विचार सुरू झाला आहे.
विद्यापीठानेच दिले तक्रार करण्याचे आदेश
दरम्यान, ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांविरोधात कुलसचिव किंवा उपकुलसचिवांनी पोलीस तक्रार का केली नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र सुरक्षेची जबाबदारी ‘एमएसएफ’ची होती. त्यामुळे घटनेनंतर पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश देण्यात आले होते. आम्ही कुठल्याही राजकीय दबावात नाही व हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे, असे डॉ. काणे यांनी स्पष्ट केले.