मान्सून उंबरठ्यावर; शेतकरी बांधावर

By Admin | Updated: June 16, 2014 01:13 IST2014-06-16T01:13:29+5:302014-06-16T01:13:29+5:30

मान्सून उंबरठ्यावर पोहोचला आहे. काहीच दिवसांत तो विदर्भात धडकण्याचे भाकीत केले जात आहे. त्यानुसार बळीराजाची लगबग सुरू झाली असून कृषी विभागानेही कंबर कसली आहे.

Monsoon on the threshold; Farmer builds | मान्सून उंबरठ्यावर; शेतकरी बांधावर

मान्सून उंबरठ्यावर; शेतकरी बांधावर

प्रतीक्षा पावसाची : १.५ लाख हेक्टरवर नियोजन
नागपूर : मान्सून उंबरठ्यावर पोहोचला आहे. काहीच दिवसांत तो विदर्भात धडकण्याचे भाकीत केले जात आहे. त्यानुसार बळीराजाची लगबग सुरू झाली असून कृषी विभागानेही कंबर कसली आहे. कृषी विभाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुबलक बियाणे व खताचा साठा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख ९३ हजार ८०० हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यापैकी सोयाबीनचे २ लाख २२ हजार ४४८ हेक्टर क्षेत्र असून कापूस १ लाख २४ हजार ६६५, भात ७८ हजार ८१२, ज्वारी ४ हजार ९९२, मका ५८८, भुईमूग २ हजार ८१५ व तूर पिकाचे ४४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र आहे. यासाठी यंदा कृषी विभागाने ८३ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी केली आहे. शिवाय २ हजार ७०० क्विंटल बीटी कापूस, ३१ हजार ५०० क्विंटल भात, ७५० क्विंटल भुईमूग, १ हजार ६०० क्विंटल संकरित ज्वारी व २ हजार ७०० क्विंटल तूर बियाणे मागितले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार त्यापैकी जिल्ह्यात सोयाबीनचे ४६ हजार ९६८ क्विंटल बियाणे पोहोचले आहे. तसेच कापसाचे २ हजार २१२, भात ८ हजार ९६५, संकरित ज्वारी ६०२ क्विंटल व तूर १ हजार १० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे. याशिवाय उर्वरित पुरवठाही लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कृषी विभागातर्फे ‘मागेल त्याला बियाणे’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर व धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या सोयाबीन पिकाला शेतातच अंकुर फुटले होते. शिवाय अनेकांचे सोयाबीन काळे पडले होते. त्यामुळे यंदा सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. परंतु कृषी विभागाने त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना कापूस, तूर व मका पिकाचे क्षेत्र वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खत-बियाणे महागले
यंदा खत व बियाण्यांच्या किमतीत प्रचंड भाववाढ झाली आहे. गतवर्षी ५ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल मिळणाऱ्या सोयाबीन बियाण्याच्या किमती ७ हजार ९५० रुपयांवर पोहोचल्या आहेत. तसेच धानाच्या किमती ४ हजार ५०० रुपयांवरून ६ हजार रुपयांवर व तूर बियाण्याच्या किमती ९ हजार ५०० रुपयांवरून १० हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. याशिवाय खताच्याही किमतीत वाढ झाली आहे. या संपूर्ण भाववाढीचा शेतकऱ्याला यंदा जबर फटका सहन करावा लागणार आहे.
सोयाबीनला कापसाचा पर्याय
कापूस विदर्भातील प्रमुख पीक समजल्या जाते. गतवर्षी नागपूर विभागात सुमारे ३ लाख २ हजार ९९ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली होती. परंतु यंदा त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून, कृषी विभागाने ३ लाख २४ हजार ७०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे ८ हजार १६८ पॉकिट बियाण्यांची गरज भासणार आहे. त्यानुसार महाबीज व खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून या बियाण्याची पूर्तता केली जाणार आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यासाठी १.५ लाख हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.
बियाण्यांची उगवण तपासणी
-सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण शक्ती तपासून घ्यावी.
-किमान ७० टक्के उगवण शक्तीचे प्रति हेक्टरी ७५ किलो बियाण्याची पेरणी करावी.
-उगवण शक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास बियाण्याचे प्रति हेक्टरी प्रमाण वाढवावे.
-टोकन पद्घतीने बियाणे पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते.
-सोयाबीनवर बीज प्रक्रिया करूनच त्याची पेरणी करावी.

Web Title: Monsoon on the threshold; Farmer builds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.