Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील बंदोबस्त, निवडणुकीचा अन् गुंडांचाही!पोलिसांचे अभ्यासपूर्ण नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:47 PM2019-10-22T23:47:36+5:302019-10-22T23:53:27+5:30

अभ्यासपूर्ण नियोजन आणि अचूक वेळ साधत आवश्यक तो पवित्रा घेऊन केलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमधील विधानसभा निवडणुका चुरशीत मात्र शांततेत पार पडल्या.

Maharashtra Assembly Election 2019 : In Nagpur bandobast for elections and even goons! | Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील बंदोबस्त, निवडणुकीचा अन् गुंडांचाही!पोलिसांचे अभ्यासपूर्ण नियोजन

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील बंदोबस्त, निवडणुकीचा अन् गुंडांचाही!पोलिसांचे अभ्यासपूर्ण नियोजन

googlenewsNext
ठळक मुद्देकुख्यात गुंडांची शहराबाहेर हकालपट्टी : अनेकांना डांबले कारागृहात४१ गुंडांवर एमपीडीए११ टोळ्यांवर मकोका६,८६६ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई१५५४ जणांना समजपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभ्यासपूर्ण नियोजन आणि अचूक वेळ साधत आवश्यक तो पवित्रा घेऊन केलेल्या कारवाईमुळे मुख्यमंत्र्यांच्या होमटाऊनमधील विधानसभा निवडणुका चुरशीत मात्र शांततेत पार पडल्या. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या आचारसंहितेचा पुरेपूर लाभ उठवत पोलिसांनी कायद्याचा दंडा असा काही फिरवला की शहरातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. दर दोन दिवसानंतर तडीपार, एमपीडीएचे आदेश काढून ३० गुंडांना पोलिसांनी शहराबाहेर हाकलून लावले तर ४१ गुंडांना कारागृहात डांबले. खतरनाक गुंडांच्या ११ टोळ्यांवर मकोका लावून त्यांची वर्षभरासाठी विविध कारागृहात रवानगी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असल्याने नागपुरातील विधानसभा निवडणुकीकडे केवळ राज्यच नव्हे तर आजूबाजूच्या प्रांतातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले होते. सर्वधर्मसमभाव जपणारे शहर म्हणून नागपूरची ख्याती असली तरी समाजकंटक वेळोवेळी आपला उपद्रव दाखवितात. अनेकदा गंभीर गुन्हे घडवून ते कायदा आणि सुव्यवस्थेचीही स्थिती निर्माण करतात. नेत्यांच्या मागे लपून किंवा विविध पक्षांचे पांघरूण घेऊन ते पोलिसांपासून स्वत:ची कातडी वाचवून घेतात. निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यकाळात प्रतिस्पर्धी गटावर हल्ले करून नेत्यांसमोर स्वत:चा प्रभावही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या शहरातील काही गुंडांनी कळमना, पारडी आणि हिंगणा, एमआयडीसीत एकमेकांवर जोरदार हल्ले केले होते. प्रतिस्पर्ध्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. एकमेकांना जबर मारहाणही केली होती. त्यामुळे निवडणुकीच्या आदल्या रात्री प्रचंड तणाव होता. याही वेळी विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी नागपुरातील गुन्हेगारांनी गंभीर गुन्हे घडवून आपला प्रभाव दाखविण्यासाठी उपद्रव सुरू केला होता. त्यामुळे एप्रिल-मेदरम्यान उपराजधानीतील गुन्हेगारी उफाळून आल्यासारखी झाली होती. निवडणुका तोंडावर असताना गुन्हेगारांनी वळवळ सुरू केल्याचे पाहून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक अ‍ॅक्शन प्लान आखला. त्यानुसार, गुन्हेगारांना त्यांची मूळ जागा दाखविण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुली सूट देण्यात आली. परिणामी, तडीपार, एमपीडीए, मकोका यासारख्या कारवाईचा शहरात धडाका लावण्यात आला. अवघ्या दोन महिन्यात ६,८६६ गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली, तर १५५४ जणांना समजपत्र देण्यात आले.

आंबेकरसह अनेकांचे मोडले कंबरडे 


आचारसंहितेच्या कालावधीचा पुरेपूर लाभ उठवत शहर पोलिसांनी तडीपार, एमपीडीए आणि मकोकासारखे कायद्याचे प्रभावी अस्त्र वापरून गुंडांच्या मुळावर घाव घालणे सुरू केले. टॉप टेन टोळ्यांसोबतच नागपुरातील सर्वात मोठा गुंड म्हणून कुख्यात असलेला गँगस्टर संतोष आंबेकर याचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात पहिल्यांदाच पोलिसांनी यश मिळवले. त्याच्या धाकात असलेल्यांसोबतच त्याच्या शोषणाला बळी पडलेली तरुणी आणि त्याच्याच टोळीत त्याच्या सांगण्यावरून बाल्या गावंडेची हत्या करणाºयालाही आंबेकरविरुद्ध तक्रार देण्याची हिंमत पोलिसांच्या स्पेशल अ‍ॅक्शन प्लानमुळेच होऊ शकली. याच अ‍ॅक्शन प्लाननुसार खतरनाक गुंड नौशाद, सुमित चिंतलवार, शेखू यांना अटक करून त्यांच्यासह ३१ जणांना कारागृहात डांबण्यात आले. ९० जणांवर हद्दपारीचा आदेश बजावून त्यांना शहराबाहेर हाकलून लावण्यात आले. ११ टोळ्यांवरील ६१ खतरनाक गुन्हेगारांवर मकोका लावून त्यांना विविध कारागृहात डांबण्यात आले. पोलिसांच्या या अ‍ॅक्शन प्लानमुळे एकीकडे उपराजधानीतील गुन्हेगारीचे कंबरडे मोडले गेले तर दुसरीकडे निवडणुका शांततेत पार पडल्या.

२४, २५ ऑक्टोबर महत्त्वाचे!
पोलिसांनी नियोजनपूर्वक बंदोबस्त केल्यामुळे उपराधानीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. मात्र, निकालाचा (२४ ऑक्टोबर) आणि त्यानंतरचा दुसरा दिवस(२५ ऑक्टोबर)ही महत्त्वाचा आहे. त्यामुळे आम्ही या दोन दिवसातही तेवढेच सतर्क राहणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतला सांगितले. सर्व प्रमुख उमेदवारांचे निवासस्थान, त्यांच्या प्रचार कार्यालयाजवळ तगडा बंदोबस्त राहणार आहे. संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण स्थळे, वस्त्या आणि चौकाचौकात मोठा बंदोबस्त राहणार आहे. निवडणूक प्रचाराच्या कालावधीत आणि मतदानाच्या दिवशी कसल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. आता निकालानंतरही अनुचित घटना घडणार नाही, असा विश्वास डॉ. उपाध्याय यांनी व्यक्त केला.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : In Nagpur bandobast for elections and even goons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.