रणभूमीतील दिग्गज ; जतिराम बर्वेंचा एक विक्रम असाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:16 IST2019-03-16T16:15:20+5:302019-03-16T16:16:27+5:30
रामटेकच्या रणभूमीत भोसले घरण्याची संसदेत एन्ट्री असो वा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा विजय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय राजकारणात विशिष्ट महत्त्व ठेवणारी ठरली आहे.

रणभूमीतील दिग्गज ; जतिराम बर्वेंचा एक विक्रम असाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेकच्या रणभूमीत भोसले घरण्याची संसदेत एन्ट्री असो वा माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा विजय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भारतीय राजकारणात विशिष्ट महत्त्व ठेवणारी ठरली आहे. १९८० मध्ये अशीच एक ऐतिहासिक नोंद या मतदारसंघात झाली. ती म्हणजे राज्यात सर्वाधिक जास्त मतांनी निवडून येण्याची. हा विक्रम केला आहे काँग्रेसचे जतिराम बर्वे यांनी.
१९७७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर संसदेत पोहोचणाऱ्या बर्वे यांना कॉँग्रेसने पुन्हा एकदा १९८० मध्ये रामटेकच्या रणभूमीत उतरविले. तेव्हा त्यांच्याविरोधात जनता पार्टीचे राजेंद्रबाबू देशमुख, जनता पार्टी (एस)चे पुरुषोत्तम राऊत, काँग्रेस (अर्स)चे चंद्रकांत राऊत यांच्यासह अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाकरराव तिडके, देवराव मेश्राम, रामकृष्ण दाणी, कोठीराम गजभिये, काशिनाथ कराडे हे उमेदवार रिंगणात होते. त्यात जतिराम बर्वे यांनी २ लाख ७३ हजार ९५७ मते घेत राजेंद्रबाबू देशमुख यांचा २ लाख १४ हजार ७६३ मतांच्या फरकाने पराभव केला. त्यावेळी देशमुख यांना ५९ हजार १९४ मतांवरच समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मताधिक्याने विजयी होण्याचा मान बर्वे यांना जातो. १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधी देशात सर्वाधिक जास्त मताधिक्याने निवडून आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी रायबरेली (उत्तर प्रदेश) आणि मेडक (आंध्र प्रदेश) अशा दोन लोकसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढविली होती. यातील मेडक या मतदारसंघातून त्यांनी २ लाख १९ हजार १२४ मतांच्या फरकाने जनता पार्टीच्या एस. जयपाल रेड्डी यांचा पराभव केला. इंदिरा गांधी यांना ३ लाख १ हजार ५७७ तर रेड्डी यांना ८२ हजार ४५३ मते मिळाली होती. रायबरेलीत त्यांना २ लाख २३ हजार ९०३ मते मिळाली. त्यांच्याविरोधातील जनता पार्टीच्या विजया राजे सिंधीया यांनी ५० हजार २४९ मते घेतली. पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून मात्र त्या केवळ १ लाख ७३ हजार ६५४ मतांनी विजयी झाल्या.
१९८० च्या निवडणुकीत देशात पहिल्या क्रमांकाचे मताधिक्याने विजयी होण्याचा मान इंदिरा गांधी यांना तर महाराष्ट्रातून पहिल्या आणि देशातून दुसºया क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होण्याचा मान हा रामटेक लोकसभा क्षेत्रातून विजयी झालेल्या जतिराम बर्वे यांच्या नावाने आहे.
असे असले तरी यापूर्वीचा रामटेक लोकसभा क्षेत्राचा १९७१ च्या निवडणुकीतील विक्रम मात्र जतिराम बर्वे हे मोडू शकले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसचे अमृत सोनार हे २ लाख ३१ हजार ७४२ मतांनी विजयी झले होते.
सोनार यांना २ लाख ८० हजार ५४ तर फॉरवर्ड ब्लॉकचे आनंदराव कळमकर यांनी ४८ हजार ३१२ मते पडली होती.