‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ : स्वच्छतेची घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 20:34 IST2019-09-18T20:32:36+5:302019-09-18T20:34:54+5:30
स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करताना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केले.

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ : स्वच्छतेची घेतली शपथ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करताना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना व उपस्थित कर्मचाऱ्यांना जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले.
स्वच्छता ही सेवा- २०१९ या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ संजय यादव यानंी श्रमदानाच्या माध्यमातून केला. यावेळी उपस्थित अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी प्रिया तेलकुंटे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे, जिल्हा आरोग्य अघिकारी डॉ. दीपक सेलोकर, समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता बी. व्ही. सयाम, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव हेमके तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ केला.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सन २०१७ पासून स्वच्छता ही सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून या माध्यमातून शौचालयाचा नियमित वापर, स्वच्छतेसाठी बदल घडविणारे उपक्रम आणि सार्वजनीक ठिकाणी श्रमदान केले जात आहे. स्वच्छता ही सेवा- २०१९ मध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. या अभियानाची जिल्ह्यात २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत अंमलबजावणी होणार आहे.
या उपक्रमाची जिल्हाभर व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व पंचायत समिती, ग्रामपंचायतींना महाश्रमदानाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे. ग्रामस्थांनी ‘स्वच्छ व सुंदर गाव’ ही वैयक्तिक जबाबदारी समजून यात सहभागी व्हावे.
अनिल किटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता), जि.प.