‘खर्रा’ ठरतोय अभिशाप
By Admin | Updated: July 6, 2015 03:07 IST2015-07-06T03:07:36+5:302015-07-06T03:07:36+5:30
आकर्षण आणि थ्रील अनुभवण्याच्या हव्यासापायी खर्ऱ्याची व्यसनाधीनता वाढत चालली आहे.

‘खर्रा’ ठरतोय अभिशाप
सुमेध वाघमारे नागपूर
आकर्षण आणि थ्रील अनुभवण्याच्या हव्यासापायी खर्ऱ्याची व्यसनाधीनता वाढत चालली आहे. लहानपणापासूनच खर्ऱ्याचे व्यसन लागल्याने वयाच्या तिशीतच कर्करोगाची लागण झाल्याची शेकडो उदाहरणे समोर येत आहेत. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय १९९७ पासून तंबाखूमुळे होणाऱ्या रुग्णांची नोंदणी करीत आहे. यात असे निदर्शनास आले की गेल्या चार वर्षांत मुखपूर्व कर्करोग म्हणजे ज्यांना खर्ऱ्यामुळे पूर्णपणे तोंड उघडता येत नाही (ओरल सबम्युकस फायब्रोसिस) अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. मे २०१२ ते एप्रिल २०१५ या वर्षांत अशा १८५७ रुग्णांची नोंद झाली आहे तर पुढे हा आजार मुखकर्करोगात होत असल्याने असे ३४४ रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असतानाही पानठेल्याला खर्रा व्यवसायाचे स्वरूप आले आहे. दिवसभर खर्रा घोटणारी तरुणाई आणि त्याच्या ‘महागड्या’ पुड्या खिशात बाळगून टाइमपास करणारी मंडळी कमी होण्यापेक्षा त्यात वाढच होत असल्याचे चित्र आहे.
तोंडात खर्ऱ्याचा बकणा आणि जागोजागी उडणाऱ्या त्याच्या लाल पिचकाऱ्याचे ‘परिणाम’ आता दिसून येऊ लागले आहेत. खिशातील पैसे आणि आयुष्य एकाचवेळी बर्बाद होत असल्याचे वास्तव शासकीय दंत रुग्णालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाने सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
पानटपरीचालकांमध्ये जनजागृतीची मोहीम
तंबाखूजन्य पदार्थ मानवी आरोग्यासाठी घातक असून १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे हा गुन्हा आहे. हा वैधानिक इशारा देणारा फलक पानटपऱ्यांवर लावण्याचा नियम आहे. परंतु शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने केलेल्या एका सर्वेक्षणात ८० पानटपऱ्यांमधून केवळ पाच पानटपऱ्यांवर हे फलक दिसून आले. अल्पवयीन मुलांमध्ये वाढते खर्ऱ्याचे व्यसन पाहता, महाविद्यालयाच्यावतीने पानटपरीचालकांमध्ये याविषयी जनजागृती केली जात आहे.
-डॉ. विनय हजारे
अधिष्ठाता, शा. दंत महाविद्यालय व रुग्णालय
प्रत्यक्ष अंमलबजावणीपेक्षा गवगवाच जास्त
गुटखाबंदीनंतर सुगंधित सुपारीवर बंदी आणण्यात आली आहे. असे असतानाही, वऱ्हाडी खर्रा, माजा खर्रा, १२० खर्रा, १६० खर्रा, ३२० खर्रा आदींसह विविध प्रकारच्या खर्ऱ्यांची शहरात सर्रास विक्र ी होते. प्रत्यक्ष अंमलबजावणीपेक्षाही त्या अंमलबजावणीचा गवगवाच फार झाला. परिणामी, खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यापेक्षा खर्ऱ्याच्या किंमती वाढल्या आहेत.