केदारनाथची आपत्ती शासनाच्या चुकीमुळेच

By Admin | Updated: June 15, 2014 00:42 IST2014-06-15T00:42:15+5:302014-06-15T00:42:15+5:30

केदारनाथमधील आपत्ती ही नैसर्गिक नसून शासनाची चूक आहे. शासनाने तातडीने पावले उचलली असती तर एकाही यात्रेकरूला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी टीका केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती

Kedarnath's misery was due to the misdeeds of the government | केदारनाथची आपत्ती शासनाच्या चुकीमुळेच

केदारनाथची आपत्ती शासनाच्या चुकीमुळेच

उमा भारती यांची टीका : नर्मदा धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत
नागपूर : केदारनाथमधील आपत्ती ही नैसर्गिक नसून शासनाची चूक आहे. शासनाने तातडीने पावले उचलली असती तर एकाही यात्रेकरूला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी टीका केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी शनिवारी येथे केली.
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच नागपुरात आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या केदारनाथमध्ये घडलेली दुर्घटना नैसर्गिक नव्हती. त्यासाठी तेथील शासनाची चूक कारणीभूत ठरली. केदारनाथमध्ये पाणी भरले तेव्हा लोकांना आधीच कल्पना द्यायला हवी होती. त्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढता आले असते. परंतु शासनाने आपले काम योग्यपणे बजावले नाही. परिणामी शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला.
काँग्रेसप्रणित युपीए सरकारवर जोरदार प्रहार केले. केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने भाजपशासित मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांवर नेहमीच अन्याय केला.
गंगा नदीमध्ये थुंकल्यावरून सध्या बरेच वादळ उठले आहे. यावर त्यांना छेडले असता त्या म्हणाल्या की, गंगा नदीमध्ये थुंकल्यास कठोर शिक्षा केली जाईल, यासंबंधात कुप्रचार केला जात आहे. कशाप्रकारे हा प्रकार थांबविता येईल, दंड कसा आकारता येईल, यावर अजून चर्चा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नर्मदा नदीवरील धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. सर्व बाबी विचारात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे धरणाची उंची वाढल्यास सर्वांचाच फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोसेखुर्दकडे लक्ष द्या,
गडकरींची विनंती
उमा भारती या नागपूर दौऱ्यावर असताना त्या काही वेळ रविभवन येथे थांबल्या होत्या. त्यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची नागपूरच्या विविध प्रश्नांसंदर्भात रविभवन सभागृहात बैठक सुरू होती. उमा भारती यांना याबाबत कळताच त्यांनी बैठक स्थळी जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेतली. या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दकडे लक्ष द्या, अशी विनंती नितीन गडकरी यांनी उमा भारती यांना केली.

Web Title: Kedarnath's misery was due to the misdeeds of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.