शांतीचं प्रतीक आता संकटाचं कारण? कबुतरांवरून वाद पेटला!
By मंगेश व्यवहारे | Updated: August 11, 2025 15:22 IST2025-08-11T15:21:13+5:302025-08-11T15:22:04+5:30
Nagpur : निसर्गाच्या अन्नसाखळीतील तोही एक जीव आहे, त्याला उपाशी कसे ठेवता येईल

Is the symbol of peace now the cause of trouble? Controversy over pigeons!
मंगेश व्यवहारे
नागपूर : मुंबईच्या कबुतरखान्याचा वाद कबुतरांच्या जिवावर उठला आहे. माणसाळलेला हा पक्षी जंगलापेक्षा शहरात, वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळेच मुंबई, हैद्राबाद, लखनौ, कानपूर, दिल्ली, ओडिशा या भागांत कबूतरखाने बघायला मिळतात. मात्र, अचानक हे कबूतर माणसाच्या आरोग्यावर उठले आहे. न्यायालयांपर्यंत हा वाद गेला आहे.
पण कबूतर तर हा प्राचीन काळापासून मानवाचा सहकारी राहिला आहे. त्याला अमन, शांती, प्रेमाचे प्रतिक मानले गेले आहे. संदेश वाहक म्हणून त्याचा वापर केला जात असल्याचे ऐतिहासिक दाखले आहे. कबूतर इतका मानसाळलेला आहे की, त्याला पाळीव पक्षांप्रमाणे पाळले जाते. कालऔघात त्याची उपयोगिता आता बदलली असून, त्याच्यावर आता जुगार देखील खेळला जातोय. असा हा गुटर गु.. करणाऱ्या पक्ष्यांची जगात ५० हून अधिक प्रजाती आहे. त्यातील १२ हून अधिक प्रजाती भारतात आढळतात.
कबुतरांच्या संदर्भात ऐतिहासिक दाखले आढळतात
- इजिप्त, पर्शिया आणि रोम साम्राज्यात कबुतरांचा वापर संदेश पोहोचवण्यासाठी केला जात असे. युद्धकाळात कबूतरांचा हॉमिंग पिजन म्हणून वापर होत असे. ते लांब पल्ल्याचे संदेश सुरक्षितपणे नेऊ शकत होते.
- भारताचा संदर्भ मुघल सम्राट अकबराच्या काळात "हवा महल" सारखी कबुतर पोस्ट व्यवस्था होती. मराठा साम्राज्यातही युद्धातील संदेश जलद पोहोचवण्यासाठी कबूतरांचा वापर केला जात असे.
- इस्लामिक संस्कृतीत मक्का-मदिना परिसरात कबुतरांना पवित्र मानले जाते. त्यांना इजा पोहोचवणे पाप समजले जाते.
- ख्रिश्चन धर्मात कबूतर हे शांती आणि पवित्र आत्याचे प्रतिक आहे.
- हिंदू धर्मातही कबूतराला शांतता, करुणा आणि सत्कर्माचे प्रतिक मानले जाते.
धार्मिक भावना जुळलेल्या आहे
मुंबईतील कबूतरखान्यांची सुरुवात धार्मिक भावनेतून झाली आहे. जैन आणि गुजराती समाजातील व्यक्तींनी पुण्याची भावना बाळगून कबूतरांना दाणा वाटण्यासाठी "चबुतरे" तयार केले. पुढे ते "कबूतरखाने" म्हणून विकसित झाले. मुंबईतले अनेक कबूतरखाने मुंबईच्या जैन मंदिराजवळ उभारण्यात आले आहे. कबुतरखान्यांना १०० वर्षे झाले आहे. हे आज हेरिटेज म्हणूनही ओळखले जातात.
"जवळपास नागपुरातही लोकांकडून कबुतरखाने आहे. हा जीवच मुळात माणसाळलेला आहे. त्याच्या दिर्घकालीन सान्निध्यात राहिल्यास आणि काळजी न घेतल्यास श्वसनाचे आजार होऊ शकतात. पण, हॅण्डवॉश केल्यास तोंडाला मास्क लावल्यास आजारांपासून सहज बचाव करता येते. निसर्गाच्या अन्नसाखळीत प्रत्येक जीव एकमेकांवर निर्भर आहे. वर्षानुवर्षांपासून मानवाचा सखा असलेला कबुतर जिवावर उठणार नाही. त्यामुळे त्याला उपाशी ठेवणे योग्य नाही."
- डॉ. हेमंत जैन, ज्येष्ठ पशुपक्षीतज्ज्ञ