Independence Day 2018; नागपूर जिल्ह्यातील ‘किरंगीसर्रा’त कधी पोहोचतील स्वातंत्र्याची किरणे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 11:16 IST2018-08-16T11:12:07+5:302018-08-16T11:16:24+5:30
पूर्णत: आदिवासी डोंगराळ, व जंगलव्याप्त किरंगीसर्रा गाव स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही ‘स्वतंत्र’ झाले नाही.

Independence Day 2018; नागपूर जिल्ह्यातील ‘किरंगीसर्रा’त कधी पोहोचतील स्वातंत्र्याची किरणे ?
कैलास निघोट।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्णत: आदिवासी डोंगराळ, व जंगलव्याप्त किरंगीसर्रा गाव स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही ‘स्वतंत्र’ झाले नाही. या गावाची व्यथा पाहता कुणाच्याही हृदयाला धक्का बसेल. परंतु सरकारला याच्याशी काहीही घेणदेणे नाही. त्यामुळे स्वातंत्र्यपर्वाची किरणे आमच्या गावात पडतील काय, असा सवाल येथील आदिवासी नागरिक करीत आहे. किरंगीसर्रा (ता. पारशिवनी) हे गाव पूर्णत: आदिवासी असून डोंगराळ व जंगलव्याप्त आहे.
या गावातील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या किंवा तहसीलच्या कामासाठी ५० किमी अंतरावर जावे लागते. त्यासाठी त्यांना आधी डोंग्यात बसून किरंगीसर्रा ते कोलितमारा हे अंतर पार करावे लागते. सदर नावेचा प्रवास हा पेंच धरणाच्या मागचा भाग असून येथे सदैव पाणी असते. हे अंतर केवळ अर्धा किमी असले तरी पाणी कमी असल्याने व पाण्यात शेवाळ असल्याने दोन किमीचा वेढा मारु न जावे लागते. या पाण्यात मगर असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी गावकऱ्यांना २५ मिनिटे लागताते. एकीकडे पारशिवनी तर दुसरी बाजारपेठ पवनी असून फक्त भाजीपाला किंवा काही किरकोळ साहित्यासाठी कोणतीही साधने उपलब्ध नाही. त्यासाठी त्यांना स्वत:च्या साधनाने जावे लागते.