कोशियारी समितीची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:16 IST2018-07-06T00:15:03+5:302018-07-06T00:16:20+5:30

भगतसिंग कोशियारी समितीच्या अहवालाची पूर्णत: अंमलबजावणी करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यात सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. नागपुरात निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी विधिमंडळावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना दिले. निलंगेकर पाटील यांनी तातडीने निवेदन केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या सूचना सचिवांना देऊन त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले.

Implement the Koshiari Samiti | कोशियारी समितीची अंमलबजावणी करा

कोशियारी समितीची अंमलबजावणी करा

ठळक मुद्दे निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचा मोर्चा : मागण्यांच्या निवेदनाची कामगार मंत्र्यांनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भगतसिंग कोशियारी समितीच्या अहवालाची पूर्णत: अंमलबजावणी करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्यात सर्वच जिल्ह्याच्या ठिकाणी निवृत्त कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. नागपुरात निवृत्त कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने गुरुवारी विधिमंडळावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना दिले. निलंगेकर पाटील यांनी तातडीने निवेदन केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या सूचना सचिवांना देऊन त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले.
राज्य पावसाळी विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी निवृत्त कर्मचारी (१९९५) समन्वय समिती नागपूरच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून मोर्चा निघाला. मोर्चाचे नेतृत्व समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे व राष्ट्रीय  महासचिव प्रकाश पाठक यांनी केले. ‘लोकमत’शी बोलताना पाठक म्हणाले, राज्यात १५ लाख निवृत्त कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याची महत्त्वपूर्ण ३५ वर्षांची सेवा राज्याला दिली आहे. यामुळे वय झाले म्हणून राज्य सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून ‘भगतसिंग कोशियारी समितीचा अहवाल’ पूर्णत: लागू करण्यासाठी प्रयत्न करावा, सोबतच सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पेन्शन लागू करावी, ही आमची मागणी असल्याचे पाठक म्हणाले.
मोर्चाचे निवेदन मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे यासाठी मोर्चेकरी अडून बसल्याने काही वेळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना निवेदन देण्याची विनंती केली. मोर्चाच्या शिष्टमंडळाने निलंगेकर पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मंत्र्यांनी हा विषय केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील असल्याने तातडीने निवेदन पाठविले जाईल, सोबतच त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात नागपूर शाखा अध्यक्ष श्याम देशमुख, भीमराव डोंगरे, पुंडलिक पांडे, अभिनंदन पळसापुरे, प्रभाकर खोेंड, प्रकाश दामले, महमद युनूस, अनिल कुसरे, अरुण कारमोरे, दिनेश वेखंडे आदींचा सहभाग होता.

Web Title: Implement the Koshiari Samiti