भजन, संगीतामुळे मानवाचे जीवन प्रभावशाली
By Admin | Updated: June 20, 2016 02:51 IST2016-06-20T02:51:38+5:302016-06-20T02:51:38+5:30
भजन, संगीतातून मनाला आनंद मिळून मन प्रसन्न होते. परमेश्वराच्या नामस्मरणातून मिळालेला आनंद इतर आनंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो.

भजन, संगीतामुळे मानवाचे जीवन प्रभावशाली
नितीन गडकरी : ‘अर्पितो गुरुवंदना’ सीडीचा लोकार्पण समारंभ
नागपूर : भजन, संगीतातून मनाला आनंद मिळून मन प्रसन्न होते. परमेश्वराच्या नामस्मरणातून मिळालेला आनंद इतर आनंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. त्यामुळे भजन, संगीताचा प्रभाव माणसाच्या व्यक्तिमत्त्वावर पडून त्याचे जीवन प्रभावशाली होते, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान रेशीमबागतर्फे संतकवी कमलासुत रचित ‘अर्पितो गुरुवंदना’ सिडीच्या लोकार्पण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध सिनेपार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, सिने संगीतकार नंदू होनप, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, शिक्षक आमदार ना. गो. गाणार, सामाजिक कार्यकर्ता रवी पुट्टेवार उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, चंद्रशेखर वराडपांडे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. लोक मंदिराचे घर करतात, परंतु त्यांनी घराचे मंदिर केले. त्यांचे दर्शन झाल्यावर गजानन महाराजांचे दर्शन झाल्याचा भास होत असे. ईश्वराची भक्ती करताना शोषित, पीडित, अंध, अपंगांची सेवा करताना मोठा आनंद मिळतो. कमलासुतांचे जीवन गजाननमय झाले होते. त्यांनी सातत्याने भक्तगणांना प्रेरणा दिली. त्यांच्या जीवनात संवेदनशीलता, भक्ती होती. त्यामुळे माणुस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुराधा पौडवाल यांनी गजानन महाराज,संतकवी कमलासुतांवर श्रद्धा असल्याचे सांगून सीडी भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सिने संगीतकार नंदू होनप म्हणाले, कमलासुतांसारखे गुरु लाभण्यासाठी भाग्य लागते.
सद्गुरुच्या कार्यात आत्मिक समाधान असते. गजानन महाराजांवरील सिडी ऐकण्याची नसून अनुभवण्याची असल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश वराडपांडे यांनी चंद्रशेखर वराडपांडे ऊर्फ संतकवी कमलासुत यांच्या आठवणींना उजाळा दिला. आभार डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी मानले. कार्यक्रमाला गजानन महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मंदिर परिसर स्वच्छ असावा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदेशातील मंदिरांचा परिसर अतिशय स्वच्छ असल्याचे सांगून तेथील मंदिराकडे जाणारे रस्ते अतिशय चांगले असतात. परंतु भारतात मंदिराचा परिसर अस्वच्छ असतो. रस्ते व्यवस्थित नसतात. त्यामुळे प्रत्येक गावातील मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील सर्व धर्माच्या नागरिकांची तीर्थस्थळे जोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सिमेंट रस्त्यांचे काम करण्यात येत असल्याचे सांगून २५ हजार कोटी रुपये खर्च करून विविध धार्मिक स्थळांकडे जाणारा पालखी मार्ग तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.