बोगस पोलिसांचा उपराजधानीत हैदोस
By Admin | Updated: May 12, 2014 01:05 IST2014-05-12T01:05:42+5:302014-05-12T01:05:42+5:30
स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांना लुटणार्या टोळीने उपराजधानीत हैदोस माजविला आहे. या टोळीने गेल्या चार महिन्यात १६ लोकांना लुटले आहे.

बोगस पोलिसांचा उपराजधानीत हैदोस
नागपूर : स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांना लुटणार्या टोळीने उपराजधानीत हैदोस माजविला आहे. या टोळीने गेल्या चार महिन्यात १६ लोकांना लुटले आहे. वाढलेल्या या घटनांमुळे चिंतित वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी आपल्या कर्मचार्यांना फटकारल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून ही टोळी शांत आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस असल्याचे सांगून लुटण्याच्या घटना शहरात दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. आरोपी पायी किंवा बाईकवर येतात. एकट्यादुकट्या पायी जाणार्या ज्येष्ठ नागरिकांना ते हेरतात आणि त्यांना आपण पोलीस असल्याचे सांगतात. हातातील व गळ्यातील दागिने काढून ठेवायला सांगतात. ते दागिने एका पुडीत बांधून देण्याचे प्रयत्न करीत दागिने घेऊन फरार होतात. सूत्रानुसार बोगस पोलीस बनून लुटणारी स्थानिक आणि बाहेरची टोळी आहे. बाहेरची टोळीसुद्धा स्थानिकांच्या मदतीनेच लुटपाट करते. बाहेरच्या टोळीमध्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील सदस्य आहेत. त्यांचे स्थानिक गुन्हेगार, आॅटोचालक आणि पोलीस कर्मचार्यांशी संबंध असतात. स्थानिक साथीदारांच्या मदतीमुळे त्यांना पोलीस आणि शहराबद्दलची माहिती मिळत असते. अनुकूल परिस्थिती असताना ही टोळी शहरात प्रवेश करते. या टोळीतील सदस्य दोन किंवा तीन सदस्यांची एक टोळी तयार करून सावज शोधण्यास निघतात. दागिने घालून असलेला ज्येष्ठ नागरिक दिसताच त्याला थांबवतात. यापैकी एकजण देखरेख ठेवतो तर दुसरा त्याला फसवित असतो. दीड ते दोन मिनिटात ते दागिने घेऊन फरार होतात. त्यांच्या बोलण्याने अडकलेल्या ज्येष्ठ नागरिकाला सुरुवातीला काहीच कळत नाही. काही वेळानंतर किंवा घरी आल्यावरच दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात येते. बाहेरची टोळी मदत करणार्या स्थानिक टोळीला दागिन्याच्या किमतीच्या आधारावर हिस्सा देते. दोन्ही टोळींमध्ये योग्य समन्वय असल्याने ही टोळी पोलिसांच्या हाती लागलेली नाही. एखादवेळी लुटलेल्या दागिन्याच्या हिस्सेवाटणीवरून वाद झाल्याने सापडण्याची भीती असते. अशाच प्रकारच्या एका वादातून १० महिन्यांपूर्वी एक टोळी पोलिसांच्या हाती लागली होती. परंतु पोलिसांनी त्या टोळीकडूनही वसुली करून तिला सोडून दिले होते. गुन्हे शाखेकडूनही त्या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. याचप्रकारे स्थानिक टोळीमध्ये निलंबित किंवा बरखास्त पोलीस कर्मचारी आणि गुन्हेगार सामील असतात. पोलिसांचा मेंदू असल्याने त्यांचे काम आणखी सोपे होते. एकवेळ बोगस पोलिसांच्या टोळीमध्ये इराणी गँगची दहशत होती. पोलिसांची नजर पडल्याने ही टोळी दुसर्या क्षेत्रात सक्रिय झाली आहे. ही टोळी शहर आणि ग्रामीण भागाात मोठ्या प्रमाणावर पसरली आहे.