नागपुरातील शांतिनगरात गुंडांची दहशत : चाकू हल्ल्यात तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 08:36 PM2020-06-08T20:36:16+5:302020-06-08T20:38:01+5:30
जुना वाद उकरून काढत गुंडाच्या एका टोळक्याने तिघांवर चाकू हल्ला केला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमनगर लोधीपुऱ्यात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुना वाद उकरून काढत गुंडाच्या एका टोळक्याने तिघांवर चाकू हल्ला केला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेमनगर लोधीपुऱ्यात रविवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.
शुभम बाबू वर्मा (वय २५), त्याचा आतेभाऊ रोशन वर्मा आणि गोलू वर्मा अशी जखमींची नावे आहेत. फिर्यादी शुभम वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचा आतेभाऊ रोशन हे दोघे रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर घरासमोर बोलत उभे असताना आरोपी अनुज पाठक, छोटू गौरकर, निखील गौरकर, शैलेश पुरी आणि पवन वर्मा तसेच भिजू नावाचा त्यांचा साथीदार तेथे आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी वर्माकडून आरोपींची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तो वाद उकरून काढून आरोपी अनुज पाठक याने शुभमसोबत वाद घातला. ते शुभमला मारहाण करत असल्याचे पाहून गोलू वर्मा धावला. आरोपीने त्यालाही मारहाण केली. त्यामुळे रोशन मदतीला आला असता आरोपी अनुज पाठक याने चाकू काढला. धोका लक्षात घेऊन शुभम, गोलू आणि रोशन या तिघांनी तेथून पळ काढला असता आरोपीने त्यांचा पाठलाग करून त्यांना कन्हेर बाबा मठाच्या समोर गाठले. शुभमच्या जांघेवर तसेच रोशनच्या मागच्या बाजूला आणि गोलूच्या हातावर चाकू मारून आरोपीने या तिघांना जबर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात नागरिक जमल्याचे पाहून आरोपींनी पळ काढला. माहिती कळताच शांतिनगर पोलीस ताफा तेथे पोहचला. त्यांनी आरोपींची रात्रभर शोधाशोध केली. मात्र आरोपी हाती लागले नाही. शुभम वर्माच्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.