आधी कोरोना जाणार की आधी व्यापारी मरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:07+5:302021-04-07T04:08:07+5:30

नागपूर : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कठोर निर्बंधाच्या स्वरूपात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावले आहे. पहिल्याच दिवशी दुकाने ...

Go to Corona first or the merchant will die first! | आधी कोरोना जाणार की आधी व्यापारी मरणार!

आधी कोरोना जाणार की आधी व्यापारी मरणार!

नागपूर : राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कठोर निर्बंधाच्या स्वरूपात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावले आहे. पहिल्याच दिवशी दुकाने उघडायची वा नाहीत, यावर व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता. इतवारी या मुख्य बाजारपेठेत दुकाने उघडण्यासंदर्भात व्यापारी आणि पोलिसांमध्ये वाद होऊन काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेकडो व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध नारेबाजी केली. लॉकडाऊन लावून शासन व्यापाऱ्यांना आर्थिक संकटात टाकत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. शासनाच्या निर्णयाने आधी कोरोना जाणार की आधी व्यापारी मरणार, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

सकाळी ११ वाजता व्यापारी इतवारी मुख्य बाजारात गोळा झाले. यावेळी लगतच्या सर्वच बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी दुकाने सुरू करण्यास व्यापाऱ्यांना मज्जाव केला. त्यामुळे व्यापारी चिडले आणि शासनाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. इतवारी बाजारात सोना-चांदी बाजार, भांडे बाजार, किराणा बाजार, धान्य बाजारपेठ आहे. किराणा आणि धान्य बाजार सुरू होते; पण इतवारीतील अन्य दुकानदारांनी लॉकडाऊनचा विरोध केला.

आम्ही दुकाने उघडणारच

पहिल्या दिवशी पोलिसांनी मज्जाव केला असला तरीही आम्ही दुकाने सुरू करूच, असा निर्धार व्यापाऱ्यांनी यावेळी केला. कोरोनावर नियंत्रण आणण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. दुकाने सुरू असल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही. दुकानदार कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय करीत आहेत. नागरिकांनी पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग होणार नाही. कोरोना वाढीसाठी व्यापाऱ्यांना जबाबदार ठरवू नये. ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सणाच्या महिन्यात व्यापाऱ्यांनी दुकानात माल भरला आहे. ठोक व्यापाऱ्यांना चुकारे द्यायचे आहेत. अशा स्थितीत व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ शासनाने आणू नये, अशी प्रतिक्रिया शैलेश अग्रवाल यांनी दिली.

होणार कोट्यवधी रुपयांचे नुकसान

दुकाने बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. बँकांचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे पगार, विजेचे बिल, दुकानाचे भाडे आदी खर्च व्यापाऱ्यांना करावा लागताे. गेल्या वर्षी शासनाने ठोक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना काहीही मदत केली नाही. उलट बँकांनी चक्रवाढव्याज आकारून कर्जाची वसुली केली. शिवाय आयकर रिटर्नमध्ये काहीही सूट दिली आहे. त्यानंतरही सरकारच्या व्यापाऱ्यांच्या जीवावर उठली आहे. शासनाच्या लॉकडाऊनचा निषेध करण्यात येत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

महाल बाजारात व्यापाऱ्यांचा आक्रोश

महाल बाजारात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता जवळपास २५० पेक्षा जास्त दुकाने आहेत. दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशामुळे सर्व व्यापाऱ्यांमध्ये रोष होता. व्यापाऱ्यांनी महाल चौकात एकत्रित येऊन शासनाच्या आदेशाचा निषेध आणि नारेबाजी केली. आदेश मागे घेईपर्यंत व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार विश्वास मंगलानी यांनी व्यक्त केला. शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी टिळक पुतळ्यापर्यंत रॅली काढली. याशिवाय बडकस चौक गांधी पुतळ्याजवळ व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी शेकडो व्यापारी एकत्र आले होते.

Web Title: Go to Corona first or the merchant will die first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.