दोन अपघातांत पाच ठार

By Admin | Updated: June 16, 2014 01:00 IST2014-06-16T01:00:05+5:302014-06-16T01:00:05+5:30

वर्धा जिल्ह्यात नंदोरी नजीकच्या आरंभा टोल नाका परिसरात शनिवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागावून भरधाव येणाऱ्या दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.

Five killed in two accidents | दोन अपघातांत पाच ठार

दोन अपघातांत पाच ठार

वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात : टिप्पर-दुचाकी धडकेत एक गंभीर
नंदोरी (वर्धा)/देवाडा(चंद्रपूर) : वर्धा जिल्ह्यात नंदोरी नजीकच्या आरंभा टोल नाका परिसरात शनिवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागावून भरधाव येणाऱ्या दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात देवाडापासून आठ किलोमीटरवरील सातारा येथे टिप्पर आणि दुचाकी अपघातात तीन ठार व एक गंभीर जखमी आहे.
आरंभा टोल नाका अपघातात नितीन भगत (३०) आणि उमेश आतुटकर (३२) दोघेही रा. तासगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नितीन आणि उमेश हे दोघेही एमएच-३२ एफ-०५२० या दुचाकीने गावी परत येत होते. दरम्यान, नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आरंभा टोलनाका परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सीजी ०४ जे २३१ या ट्रकवर त्यांची दुचाकी जोरदार आढळली. त्यात दोघेही जागीच ठार झाले. रस्त्यावर अंधार असल्यामुळे त्यांना रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नसावा व हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.
समुद्रपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक कुणाचा होता हे अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा येथून आठ कि.मी. अंतरावर असलेल्या सातारा येथे टिप्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तीन जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाले.
ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. शालिक सात्रे (४०), प्रदीप खेडेकर (४५) दोघेही गंगापूर तसेच सोनटक्के नामक एकाचा मृतामध्ये समावेश आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील नागुलवाही येथील रवी राऊत गंभीर जखमी आहे.
राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये बंधारा बांधण्याचे काम सुरु आहे. या बंधाऱ्याचे काम आटोपून चारही जण दुचाकीने पोंभुर्णाकडे जात होते. दरम्यान पोंभुर्णा येथून रेती घेऊन चंद्रपूरकडे टिप्पर येत असताना सातारा गावाजवळ अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शालिक सात्रे, प्रदीप खेडेकर यांचा मृत्यू झाला. तर गंभीर असलेले सोनटक्के आणि रवी राऊत यांना नागपूर येथे हलविण्यात आले.
मात्र सोनटक्के यांचा नागपूर येथे नेत असतानाच मृत्यू झाला तर रवीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेचा पुढील तपास उमरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार जे.की. शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Five killed in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.