तंत्रनिकेतनच्या बदली सत्रात प्रवेश प्रभावित होण्याची भीती
By Admin | Updated: June 23, 2014 01:15 IST2014-06-23T01:15:14+5:302014-06-23T01:15:14+5:30
राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. बदल्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत निकषांची पूर्णत: ‘वाट’

तंत्रनिकेतनच्या बदली सत्रात प्रवेश प्रभावित होण्याची भीती
निकष पायदळी : बदल्यांमध्ये घोडाबाजार होत असल्याचा सूर
विलास गावंडे - यवतमाळ
राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील राजपत्रित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. बदल्यांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने गेली अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत निकषांची पूर्णत: ‘वाट’ लावली आहे. ऐन प्रवेश प्रक्रिया कालावधीतच बदलीचे सत्र राबविले जात असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.
राज्यात असलेल्या ४० ते ४२ शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात सुमारे एक हजार २०० राजपत्रित कर्मचारी कार्यरत आहेत. यात प्राचार्य, विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी शासनाने काही निकष ठरवून दिले आहे.
किमान तीन वर्षे बदली केली जाऊ नये, पती-पत्नी एकत्रिकरणानुसार बदली करावी, मुलगा-मुलगी दहावी किंवा बारावीत शिक्षण घेत असल्यास बदली केली जावू नये, या बाबींचा बदल्या करताना प्रामुख्याने विचार केला जावा, असा नियम करून देण्यात आला आहे.
विनंती बदल्यांच्या बाबतीतही काही नियमावली ठरवून देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या सर्व नियमांना बाजूला सारत बदल्या केल्या जात आहेत.
सेवानिवृत्तीला दोन ते चार वर्षांचा कालावधी शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्याची बदली करू नये, हा नियमही वेशीवर टांगला गेला आहे. परंतु वशिलेबाजीच्या प्रकारात या सर्व बाबी बाजूला सारल्या जात आहे.
यात सदर प्रकारात न मोडणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यांवर मात्र अन्याय होत आहे. दरवर्षी साधारणत: १०० प्राध्यापक, १० ते १५ विभाग प्रमुख आणि चार ते पाच प्राचार्यांच्या बदल्या होतात. दरम्यान या सर्व लोकांच्या बदल्या नियम डावलून केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.