शेतकर्यांचा शेतमाल आता थेट ग्राहकांपर्यंत
By Admin | Updated: May 16, 2014 00:09 IST2014-05-16T00:09:04+5:302014-05-16T00:09:04+5:30
शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला, फळे या नाशवंत उत्पादनाला दलालांच्या मध्यस्थीमुळे योग्य दर मिळत नाही. यामुळे नाशवंत उत्पादनांची विक्री शेतकर्यांनी थेट खुल्या बाजारात करण्याची ...

शेतकर्यांचा शेतमाल आता थेट ग्राहकांपर्यंत
प्रक्रिया प्रारंभ : फळे व भाजीपाला विक्रीतील दलाल होणार बाद प्रफुल्ल लुंगे - सेलू (वर्धा) शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला, फळे या नाशवंत उत्पादनाला दलालांच्या मध्यस्थीमुळे योग्य दर मिळत नाही. यामुळे नाशवंत उत्पादनांची विक्री शेतकर्यांनी थेट खुल्या बाजारात करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे. शेतकर्यांनी पिकविलेल्या शेतमालाला गोदामांची व शीतगृहांची कमतरता असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या लक्षात आले. शेतकर्यांचा शेतमाल थेट बाजारपेठेत नेता यावा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात (एपीएमसी अँक्ट) बदल करण्याचा विचार केंद्रीय अर्थमंत्रालय करीत आहे. यासाठी निश्चित आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये फळे व भाज्या हा नाशवंत शेतमाल उत्पादक शेतकर्याला थेट बाजारात विकता यावा, दलालांची मध्यस्थी कमी करणे शक्य व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. अतवृष्टी, अल्पवृष्टी, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांनी फळे व भाज्यांचे मोठे नुकसान होऊन शेतकर्याला आर्थिक फटका बसतो. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्याला आपला शेतमाल थेट बाजारात नेऊ देणे त्याच्या हिताचे असल्याचे शासनाचे मत आहे. यामुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात तसा बदल करण्याचा निर्णय घेवून दलाल हटविण्याबाबत विचार केला आहे.