फडणवीस यांची राज्यातच आवश्यकता, मी परिवहन मंत्रालयात समाधानी - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 05:58 IST2017-08-26T02:18:49+5:302017-08-26T05:58:30+5:30
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील आव्हाने व समस्या बघता त्यांची येथे आवश्यकता आहे.

फडणवीस यांची राज्यातच आवश्यकता, मी परिवहन मंत्रालयात समाधानी - नितीन गडकरी
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चांगले काम करीत आहेत. सद्यस्थितीत राज्यातील आव्हाने व समस्या बघता त्यांची येथे आवश्यकता आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना घ्यायचे का, याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
गणेशपूजनानंतर गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालय सोडण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी गडकरी यांच्याकडे सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यावर गडकरी म्हणाले, माझ्याकडे भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालय आहे. या विभागांमध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. या दोन मंत्रालयात बरीच आव्हाने आहेत. बरेच काम करणे बाकी आहे. रेल्वे मंत्रालय माझ्याकडे सोपविणार असल्याच्या बातम्या मी सध्या प्रसारमाध्यमांतून वाचत आहे. अमेरिकेत एक इन्फ्रास्ट्रक्चर विभाग आहे. त्याअंतर्गत रेल्वे, नागरी उड्डयण, जल व रस्ते वाहतूक हे सर्व परिवहन विभाग येतात. काही देशांमध्ये ही व्यवस्था वेगवेगळी आहे. कुणाकडे कोणते मंत्रालय द्यायचे, कोणते विभाग एकत्र करायचे हा पूर्ण अधिकार पंतप्रधानांचा आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
देशाला सुखशांती लाभो
गडकरी यांनी आपल्या कुटुंबीयांसह घरी गणरायाची स्थापना केली. विधिवत पूजा केली. गणरायाने देशातील प्रत्येकाला सुख शांती प्रदान करावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. गडकरी म्हणाले, श्रीगणेश हे विद्येचे दैवत आहे. येत्या काळात ज्ञान, विज्ञानाचा उपयोग करून देशाने प्रगती करावी. भीती, अवर्षण, भ्रष्टाचारातून देश मुक्त होवो व ज्ञानाचा वापर करून भारताचे नवनिर्माण होवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.