तर मृतप्राय नाईक तलावालाही मिळाले असते जीवदान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:12 IST2021-02-06T04:12:12+5:302021-02-06T04:12:12+5:30
निशांत वानखेडे नागपूर : शहरात कधीकाळी १५-१६ तलाव हाेते. आज जेमतेम ७ शिल्लक आहेत. त्यातील ५ बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत ...

तर मृतप्राय नाईक तलावालाही मिळाले असते जीवदान ()
निशांत वानखेडे
नागपूर : शहरात कधीकाळी १५-१६ तलाव हाेते. आज जेमतेम ७ शिल्लक आहेत. त्यातील ५ बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत पण नाईक तलाव आणि लेंडी तलाव प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत गेले आहेत. या तलवांच्या संवर्धनाची आज नितांत गरज आहे. यासाठीच राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व संशाेधन संस्था (नीरी) ने या तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी प्लॅन्टेशन तंत्राचा उपाय सुचविला व तसा आराखडाही साेपविला हाेता. मात्र दाेन वर्षापासून हा आराखडा धूळ खात पडला असल्याने तलाव संवर्धनाबाबत महापालिकेला काही देणेघेणे नाही, असेच दिसून येते.
नीरीचे संचालक डाॅ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात व वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. रिता धापाेडकर यांच्या नेतृत्वात नीरीच्या टीमने २०१८ मध्ये शहरातील तलाव संवर्धनाचा विषय हाती घेत सर्वेक्षण अभियान राबविले. त्यानुसार नाईक तलाव आणि लेंडी तलावांचे सर्वेक्षण करण्यात आले. सॅटेलाईट सर्वेक्षणाच्या आधारे तलाव व आसपासच्या अतिक्रमणाची परिस्थिती, स्पाॅट सर्वेक्षण, प्रदूषणाचे स्रोत पाण्याची शुद्धता अशाप्रकारे सर्व दिशेने अभ्यास करण्यात आला. हा तलाव फायटाेरिड तंत्राद्वारे पुन्हा गतवैभव प्राप्त करू शकताे, असा विश्वासही नीरीने व्यक्त केला. मात्र पुढे नेहमीप्रमाणे प्रशासकीय उदासीनता आणि जनप्रतिनिधींच्या अज्ञानामुळे नीरीच्या वैज्ञानिकांचाही भ्रमनिरास झाला.
सर्वेक्षणातील सत्यस्थिती
- कधी काळी २६ एकरामध्ये असलेला लेंडी तलाव अतिक्रमणामुळे ८ एकरात संकुचित झाला. नाईक तलावाचीही तीच गत झाली.
- २००५ ते २०१७ पर्यंत तलावाचे अस्तित्वच धाेक्यात आले.
- एका माेठ्या पाईपमधून नाईक तलावात सिवेजची घाण वाहते. इतर पाच खुल्या पाॅइंटमधूनही घाण तलावात जाते.
- तलावाचे पाणी वाहून जाण्यासाठी हनुमान मंदिराजवळ ओपन चॅनल आहे, ज्यातून १.२९ एमएलडी पाणी वाहून जाते.
- लेंडी तलावाचे ओव्हरफ्लाे पाणीही नाईक तलावातच येते. कधीकाळी यातूनच नाईक तलावाची निर्मिती झाली.
प्रदूषणाची स्थिती
- संपूर्ण तलावात घरातील सिवेजची घाण, लाेकांनी फेकलेला कचरा तरंगत असताे. त्यामुळे पाेहणेच नाही, श्वास घेणेही कठीण आहे.
- तलावात अनावश्यक वनस्पतींचे जंगल पसरले आहे. या वनस्पतींनी तलावातील प्राणवायू संपविला आहे. त्यामुळे इतर जलचर प्राणी जगूच शकत नाही.
- प्रचंड प्रदूषणामुळे पाण्याचा रंग पूर्णपणे हिरवा पडला आहे. यावरून येथील पाणी काेणत्या स्तरापर्यंत दूषित झाले, याचा अंदाज येईल.
- पाण्यात आम्लाचे प्रमाण अत्याधिक वाढले आहे. माणसेच नाही तर जलचर प्राणीही यामध्ये जगू शकत नाही.
- सीओडी व बीओडी तत्वांनी धाेक्याची पातळी केव्हाच पार केली आहे. २५० ते ४०० मिलीग्रॅम/लिटर हे प्रमाण अत्याधिक आहे.
काय आहे फायटाेरिड तंत्र
- हे नीरीने विकसित केलेले वनस्पतींपासून जलशुद्धीकरण करण्याचे नैसर्गिक तंत्र आहे, जे देशभरात तलाव व नदी शुद्धीकरणासाठी वापरले जात आहे. यासाठी नीरीने फायटाेरिड वनस्पतींचा वापर केला आहे.
- तलावाचा उपसा करून गाळ आणि अनावश्यक वनस्पती काढून घेणे.
- तलावात जाणारे पाचही सिवेज एकत्रित करून मुख्य सिवेज पाईपला जाेडणे.
- त्या पाईपच्या प्रवाहासमाेर फायटाेरिड वनस्पतींची लागवड. यामुळे सिवेजचे पाणी शुद्ध हाेऊनच तलावात जाईल.
- कचरा टाकण्यावर प्रतिबंध. लाेकांमध्ये जनजागृती करणे.
- अत्यंत कमी खर्चात तलाव शुद्धीकरण शक्य. ऑपरेशन व मेंटेनन्स खर्च अत्यल्प.
- पाण्याचा पुनर्वापर व पुन:शुद्धीकरण शक्य. जलचर प्राण्यांचा अधिवास निर्माण करणे शक्य.