येथे मृतदेहांनाही भयकंप सुटत असतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 08:19 PM2020-09-12T20:19:35+5:302020-09-12T22:33:08+5:30

मृत्यू हे अंतिम सत्य आहे व ते कुणाचे टळत नाही ही वास्तविकता असली तरी हा मृत्यू शांत-निवांत व्हावा आणि जाताना चार गणगोतांच्या उपस्थितीत तो व्हावा, ही प्रत्येकाची अपेक्षा. पण कोरोना महामारीने ही अंतिम इच्छाही गर्तात टाकली आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ या मृत्यूबाबतच्या कवीच्या कल्पनेप्रमाणे क्षणभरापुरता नातलगांचा गोतावळा तर सोडाच पण अंत्यसंस्कार करताना मृतदेहालाही भयकंप सुटावा, अशी स्थिती या महामारीने निर्माण केली आहे.

Even the corpses here will be terrified ... | येथे मृतदेहांनाही भयकंप सुटत असतील...

येथे मृतदेहांनाही भयकंप सुटत असतील...

Next
ठळक मुद्देशेकडोंच्या संख्येने अंत्यसंस्कार, घाटावर व्यवस्था पडते अपुरी ऑगस्टपासून वाढला मृत्यूदर : घाटांवरचे भीषण वास्तव

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मृत्यू हे अंतिम सत्य आहे व ते कुणाचे टळत नाही ही वास्तविकता असली तरी हा मृत्यू शांत-निवांत व्हावा आणि जाताना चार गणगोतांच्या उपस्थितीत तो व्हावा, ही प्रत्येकाची अपेक्षा. पण कोरोना महामारीने ही अंतिम इच्छाही गर्तात टाकली आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ या मृत्यूबाबतच्या कवीच्या कल्पनेप्रमाणे क्षणभरापुरता नातलगांचा गोतावळा तर सोडाच पण अंत्यसंस्कार करताना मृतदेहालाही भयकंप सुटावा, अशी स्थिती या महामारीने निर्माण केली आहे. मृत्युचे हे भयाण वास्तव सध्या दहनघाटांवर अनुभवायला मिळत आहे. कोविड-१९ मुळे मृत्यूचे प्रमाण तर वाढलेच पण इतर आजारी आणि नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसत आहे. त्यामुळे स्मशानघाटांवर जागा अपुरी पडायला लागली आहे. येणारे नातेवाईक कमी झाले पण मृतदेह वाढले आहेत. शहरात १३ अधिकृत दहनघाट आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाचे कब्रस्तानसुद्धा आहे. ऑगस्ट महिन्यापासून मृत्यूदरामध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असून शहरात दररोज २०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहे. मृतदेह वाढल्याने अपुऱ्या व्यवस्थेमुळे घाटांवर प्रचंड अडचणी येत आहेत. कधीकधी एकाच ओट्यावर तीन-तीन मृतदेहावर अंत्यसंस्कार करावा लागतो. एक उरकला की दुसरा येऊन तयार. डिझेल शवदाहिनीवर भार येत असल्याने कोविडच्या मृतदेहांवरही लाकडाने अंत्यसंस्कार पार पाडावा लागतो. अशावेळी कर्मचाऱ्यांना नको ती तडजोड करावी लागत आहे. दु:ख विलोपाची स्थितीच राहिली नसून कसेही करून अंत्यसंस्काराचे सोपस्कर उरकणे, अशी गत झाली आहे. परिस्थिती भयावह असल्याने नागरिकांनी स्वत:ला जपण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

कधी एकाच ओट्यावर तीन-तीन अंत्यसंस्कार : वैशाली घाट
अशी अवस्था कधीच पाहिली नाही वैशालीनगरचा घाट तसा मोठा आहे आणि गरजेनुसार अंत्यसंस्कारासाठी १८ ओटे करण्यात आले आहेत. मात्र अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या देहांची संख्या अचानक चौपटीने वाढली आहे. त्यामुळे जागेअभावी कधीकधी तर एकाच ओट्यावर दोन बाजूला दोन आणि त्यांची रक्षा शांत होईस्तोवर मध्ये तिसऱ्या देहाचा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. मृत्यूचे हे भीषण वास्तव सांगितले घाटाच्या कर्मचाºयाने. उत्तर नागपूरच्या विस्तीर्ण अशा परिसरात अंत्यसंस्काराचा मोठा व्याप वैशाली नगरच्या दहनघाटावर अवलंबून आहे. पुरेशी व्यवस्थाही आहे पण २० वर्षाच्या सेवेत आतासारखी परिस्थिती कधीच पाहिली नाही, अशी भावना मृत्यूची नोंदणी करणाºया विनोद आंबोरे यांनी व्यक्त केली. एवढा मोठा परिसर असूनही पूर्वी ४-५ किंवा खूप तर ६ अंत्यसंस्कार व्हायचे. मात्र आता दररोज सरासरी १५ ते २० किंवा त्यापेक्षा अधिक अंत्यसंस्कार होतात. यात कोविडच्या १०-१२ रुग्णांचा समावेश असतो. ऑगस्टमध्ये ३५० च्यावर अंत्यसंस्कार झाले. १ ते १० सप्टेंबर या कालावधीत केवळ कोविडने मृत्यू पावलेल्या ५५ लोकांचे अंत्यसंस्कार झाले तर १०० च्या जवळपास सामान्य मृतांचे अंत्यसंस्कार झाले. या महिन्यात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कोविड रुग्णांसाठी डिझेल शवदाहिनीचा वापर केला जातो पण वाढत्या संख्येने त्यावर लोड येत असल्याने किंवा नातेवाईकांनी आग्रह केलाच तर लाकडावर जाळण्यात येते. तीन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर घाटाची व्यवस्था आहे आणि त्यांच्याही सुरक्षेची व्यवस्था रामभरोसे असल्याचे दिसून येते. कोविडच्या मृतासोबत आलेल्या लोकांचे पीपीई किट वाऱ्यावर असल्यासारखे बाहेरच्या डब्यामध्ये गोळा करून ठेवले जाते. सायंकाळी महापालिकेची गाडी आल्यानंतरच त्यांची उचल केली जात असल्याचे दिसून आले.

नारा घाटावर दुपटीने वाढले अंत्यसंस्कार
नारा घाट व्यवस्थेवरही या काळात अंत्यसंस्काराचा भार वाढला आहे. घाटावर पाच पक्के ओटे व एक अर्धवट आहे. पूर्वी दोन-तीन किंवा अधिकाधिक पाच अंत्यसंस्कार व्हायचे. मात्र येथेही अंत्यसंस्काराची संख्या दुपटीने वाढली. ऑगस्टमध्ये ९८ ते १०० अंत्यसंस्कार झाले पण सप्टेंबरच्या दहाच दिवसात ४६-४७ अंत्यसंस्कार होऊन गेले आहेत. यामध्ये कोविडने मृत्यू पावलेल्यांचाही समावेश आहे. मात्र डिझेल शवदाहिनीची व्यवस्था येथे नाही. त्यामुळे लाकडावरच अंत्यसंस्कार करावा लागतो. येथेही तीन कर्मचारी कार्यरत आहेत पण तीन महिन्यापासून सुरक्षा गार्डच तैनात नसल्याची माहिती मिळाली. येथे कोविड मृतांसोबत येणाऱ्यांची पीपीई किट एकतर जाळली जाते किंवा सायंकाळी गाडी आलीच तर जमा करून नेली जाते.

अंत्यसंस्कारासाठी घाटावर जागा पडताहेत अपुऱ्या : सहकारनगर घाट
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या सहकारनगर घाटावर मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यासाठी ४ ओटे आहेत. या घाटावर अजनी, राजीवनगर, खामला, सोमलवाडा, सोनेगाव, शिवणगाव, आरपीटीएस, सहकारनगर या परिसरातून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असतात. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत शिवणगाव व जयताळा येथेही घाट आहेत. त्यामुळे एरवी मृतदेहांची संख्या फार कमी असते. ऑगस्ट महिन्यात या घाटावर ७० मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले. ४ सप्टेंबरपासून घाटावर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी येत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून येथे ५ च्या सरासरीने मृतदेह येत आहेत. पण ११ सप्टेंबरला येथे ९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार ओटे असताना ९ अंत्यसंस्कार करावे लागले. एका एका ओट्यावर ३ अंत्यसंस्कार येथे झाले. येथे गॅस दहनवाहिनीचे काम सुरू आहे. सप्टेंबर महिन्यापासून मृतदेहांची संख्या घाटांवर वाढली आहे.

अंबाझरी घाट
धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या अंबाझरी घाटावर दक्षिण-पश्चिम नागपूर, पश्चिम नागपुरातील वस्त्यांमधून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या घाटावर ११ ओटे आहेत. गॅस दहनवाहिनीसुद्धा आहे. येथे एरव्ही ६ ते ७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार व्हायचे. पण ऑगस्ट महिन्यापासून घाटावर अडीचशेच्या वर अंत्यसंस्कार झाले. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी या घाटावर २१ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या किमान ७ ते ८ मृतदेहांवर सप्टेंबर महिन्यात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबरपासून मृत्यूची संख्या वाढल्याने त्रासदायक ठरत आहे.

लॉकरमध्ये पडल्याहेत अस्थी
शहरातील काही घाटांवर लॉकरची सुविधा उपलब्ध आहे. येथे राख शिरविल्यानंतर लॉकरमध्ये अस्थी ठेवण्यात येतात. अनेक महिन्यांपासून येथील लॉकरमध्ये अस्थी पडल्या आहेत. आस्थेचा विषय असल्याने, त्या नष्ट करणे शक्य नाही.

तीन दिवस पडून असते राख
मृतदेहावर अग्निसंस्कार झाल्यानंतर किमान ३ दिवसात राख विसर्जित करावी लागते. सध्या घाटावर तीन दिवस राख पडून राहिल्यास येणाºया मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओटासुद्धा उपलब्ध राहत नाही. अशावेळी घाटावरील कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची होत आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहाला परत पाठविता येत नाही, त्यामुळे कुठेतरी तडजोड करावी लागत आहे.

मानेवाडा घाटावर कोरोनाचे १२ मृतदेह
मानेवाडा घाटावर दररोज कोरोनाच्या १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहेत. या घाटावर एकूण ११ ओटे आहेत. कोरोनाच्या पूर्वी या घाटावर दररोज १० ते ११ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. परंतु आता दररोज किमान १२ कोरोनाचे मृतदेह येत आहेत. ऑगस्ट महिन्यात या घाटावर जवळपास ३२३ मृतदेह आले. यातील २०० मृतदेह कोरोना रुग्णांचे होते. एका ओट्यावर तीन मृतदेहांचे अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. काही नातेवाईकांना सकाळीच मृतदेहाची राख हवी असते. त्यांनी मृतदेह जाळलेल्या जागेवर पाणी टाकल्यास राख थंड होते. परंतु ज्यांना तीन दिवसांनी राख न्यायची असते. त्यांच्यासाठी राख ठेवण्याची व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. या घाटावरील कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने सॅनिटायझर, मास्क, पीपीई किटची व्यवस्थाही केलेली आहे.

मोक्षधाम घाटावर वाईट परिस्थिती
मोक्षधाम घाटावर एकू ण १७ ओटे आहेत. दररोज येथे २५ ते ३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनापूर्वी या घाटावर १० ते ११ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत होते. ऑगस्ट महिन्यात जवळपास ३१० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील १६० कोरोनाचे मृतदेह होते. ओट्याला लागूनच प्लॅटफॉर्म आहे. ओट्यावर जागा नसल्यास या प्लॅटफॉर्मवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. लाकडांनी अंत्यसंस्कार करायचे असल्यास या प्लॅटफॉर्मवर मृतदेहांना जागा देण्यात येते. परंतु ज्यांना गोवरीने अंत्यसंस्कार करायचे असल्यास त्यांना ओटे देणे आवश्यक असते. येथे शवदाहिनी सुद्धा आहे. परंतु मृतदेहाचे अंत्यसंस्कार शवदाहिनी, लाकूड किंवा गोवरीने करायचे याचा निर्णय नातेवाईक घेतात. येथेही तिसºया दिवशी राख न्यायची असल्यास राख ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा रुग्ण असला तरीसुद्धा त्याची राख घेण्यासाठी नातेवाईक येत असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. या घाटावरही कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, पीपीई कीट, मास्क पुरविण्यात येत आहेत.

गंगाबाई घाट

महाल, शिवाजीनगर भागात येणाऱ्या गंगाबाई घाट येथे मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्यासाठी २५ ओटे आहेत. या घाटावर इतवारी, महाल, लकडगंज, नंदनवन, वाठोडा, सक्करदरा, रेशीमबाग या परिसरातून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येत असतात. येथे अंत्यसंस्कार, शवदाहिनी, गट्टू आणि प्रेतांना पुरण्याचीही व्यवस्था आहे. शहरातील जुना आणि प्रमुख मोठा घाट असल्याने येथे एरवीही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठीची गर्दी असते. कोरोनापूर्वी येथे महिन्याकाठी सरासरी ३०० मृतदेहांचे अंत्यसंस्कार होत असत. कोरोना काळापासून हा आकडा प्रचंड वाढला आहे. ऑगस्ट महिन्यात एकट्या शवदाहिनीमध्ये १६२ प्रेतांचे अंत्यसंस्कार झाले. इतर ओट्यांवर हा आकडा पाचशेच्या वर जातो. सप्टेंबरमध्ये एकट्या शवदाहिनीत शनिवारपर्यंत ६२ प्रेतांचे अंत्यसंस्कार झाले होते आणि ओट्यांवर दीडशेच्या वर प्रेतांचे अंत्यसंस्कार झाले. येथे सद्यस्थितीला दररोज ३० ते ३५ प्रेत येत आहेत. त्यातील २० ते २५ प्रेत कोरोना संक्रमित असतात. शवदाहिनीमध्ये दररोज पाच ते सात प्रेतांचे अंत्यसंस्कार होत आहेत. रात्री उशिरापर्यंत हे क्रियाकर्म सुरू असते.

Web Title: Even the corpses here will be terrified ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.