वीज कर्मचाऱ्यांचा दररोज मृत्यूशी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:02 PM2019-08-08T23:02:42+5:302019-08-08T23:03:25+5:30

पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते.

Electricity workers face death every day | वीज कर्मचाऱ्यांचा दररोज मृत्यूशी सामना

वीज कर्मचाऱ्यांचा दररोज मृत्यूशी सामना

Next
ठळक मुद्देप्राणाची बाजी लावत काम करतात महावितरणचे जनमित्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दररोज प्रत्यक्ष मृत्यूला सामोरे जाण्याचे धाडस करणारा महावितरणकर्मचारी आपले कर्तव्य पार पाडताना प्राणाची बाजी लावत लढवय्याप्रमाणे आपले काम करीत असतो. महावितरणकर्मचारी दररोज वीजरुपी आक्राळविक्राळ शत्रूचा सामना शूर लढवय्याप्रमाणे करीत असतो. त्यातल्या त्यात पावसाळा म्हणजे वीज कर्मचाऱ्यांसाठी एखाद्या महायुद्धापेक्षा कमी नाही, वीजक्षेत्रात रिटेकला संधी नाही, एक चूक ही त्यांच्या आयुष्यातील अखेरची चूक ठरून त्यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. या सर्व गोष्टी विचारात घेऊनच सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य खातरजमा करून महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य निभावित आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातील वीजवितरण यंत्रणेत अनेक बिघाड उद्भवतात, याचा राग ग्राहकांकडून वीज कर्मचाऱ्यांवर काढ़ला जातो, मात्र वीज जाण्यामागील कारणांचा विचारही कुणी करीत नाहीत, रात्री उशिरा वीजपुरवठा खंडित होतो आणि काही वेळेनंतर तो परत सुरळीत होतो, एकीकडे सर्वत्र आधुनिकीकरणाच्या दिशेने काम सुरु असले तरी उघड्या वीजवाहिन्याची यंत्रणा सुरू अथवा बंद करण्यासाठी आजही मनुष्यबळाची गरज आहे, पाऊस सुरु असतेवेळी वीजपुरवठा खंडित झाला म्हणजे कुणीतरी जनमित्र अंधाऱ्या रात्री भर पावसात आपल्या प्राणाची पर्वा न करता वीजखांबावर चढून आपले कर्तव्य बजावित असतो. याशिवाय वीज खांबात वीज प्रवाहित होऊ नये यासाठी वीज खांबांवर चॉकलेटी अथवा पांढºया रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर्स बसविलेली असतात, बहुतांश वेळा अधिक उन अथवा वीज प्रवाहामुळे ही इन्सुलेटर्स गरम होतात आणि त्यावर पावसाच्या पाण्याचा एक थेंब पडला तरी ती फुटतात आणि यामुळे वीज खांबांमध्ये वीज प्रवाहित होऊन जमिनीत जाते अशा वेळी स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित होऊन वीजवाहिनीचा पुरवठा खंडित होतो. तो बंद न झाल्यास प्राणांतिक आणि वित्त हानी होण्याची संभावना अधिक असते. वीजवाहिनीत अकस्मात काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यास वीज उपकेंद्रातील कर्मचारी नजिकच्या उपकेंद्रासोबत संपर्क साधून तेथील वीजपुरवठ्याची स्थिती जाणून घेतात. वीजपुरवठा सुरळीत झाल्याची योग्य शहानिशा केल्यानंतरच वीजवाहिनीचा वीजपुरवठा सुरू केला जातो, आणि वाहिनी बंद झाली असल्यास संबंधित वाहिनी नादुरुस्त म्हणून जाहीर केली जाते.
वाहिनीत झालेला बिघाड शोधणे देखील एकप्रकारे तारेवरची कसरत असते, पाऊस आणि अंधाराची पर्वा न करता शोधमोहिम राबविली जाते, कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व वीज खांबांची तपासणी करावी लागते तर कधी काही खांबांदरम्यान बिघाड सापडतो.
आज नागपूर शहरात ठिकठिकाणी सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे वीजवितरण वाहिन्यांची मोठ्या प्रमाणात क्षती झाली आहे, खोदकाम तुटलेले केबल जोडली असली तरी अनेकदा जोड असलेल्या भागात पाणी साचल्याने ती केबल नादुरुस्त होऊन वीजपुरवठ्यात व्यत्यय येतो, अशा वेळी हा बिघाड नेमका कुठे झाला हे शोधून काढणे जिकरीचे काम असतानाही वादळ-वारा याची तमा न बाळगता आपल्या कर्तव्याप्रति सदैव सजग असलेला वीज कर्मचारी प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही ग्राहकाला वीज मिळावी यासाठी झटत असतो. वीजपुरवठा खंडित होताच अनेकदा ग्राहक संबंधित जनमित्र किंवा अभियंत्याला फोन करणे सुरु करतात मात्र अशा वेळी फोनवर बोलण्याऐवजी वीजपुरवठा सुरळीत करायला त्याचे प्राधान्य असल्याने तो फोन घेण्यास असमर्थ असतो.
वीज कर्मचाऱ्यांना सहकार्य करा
अनेकदा वीज आली नाही म्हणून ग्राहक संतापतात, वीज कर्मचाऱ्यांवर राग काढतात. उपरोक्त सर्व गोष्टी विचारात घेता सुरक्षेच्या उपाययोजनांची योग्य खातरजमा करून महावितरण कर्मचारी आपले कर्तव्य निभावत असतात. यात त्यांना प्राण गमवावा किंवा कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते. तेव्हा त्यांना समजून घ्यावे, वीज कर्मचाऱ्यांवर दोषारोपण करणे टाळावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. ग्राहकांनी महावितरणच्या नि:शुल्क कॉलसेंटरला किंवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहनही केले आहे.

Web Title: Electricity workers face death every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.