आठ महिन्यांत ५७ अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST2021-09-21T04:10:26+5:302021-09-21T04:10:26+5:30
नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ५७ मुली विकृतांच्या वासनेच्या शिकार ठरल्या. विशेष ...

आठ महिन्यांत ५७ अल्पवयीन मुली वासनेच्या शिकार
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ५७ मुली विकृतांच्या वासनेच्या शिकार ठरल्या. विशेष म्हणजे, यातील ५६ गुन्ह्यांतील आरोपींच्या तक्रार दाखल होताच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
आधी दिल्ली, नंतर हैदराबाद आणि आता साकीनाका मुंबईतील बलात्काराच्या घटनेमुळे पुन्हा एकदा बलात्कार आणि अपहरण (पळवून नेण्याच्या) गुन्ह्यांचा विषय सर्वत्र चर्चेला आला आहे. पोलिसांच्या उपाययोजनांचीही यासंबंधाने विश्लेषणवजा चर्चा केली जात आहे. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, अल्पवयीन मुलींचे प्रेमप्रकरण अन् त्यातून तिच्याशी कुणी शरीरसंबंध जोडत असेल तर तो बलात्कारच ठरतो. त्यामुळे अल्पवयीन मुलीचे प्रकरण समोर आले आणि पालकांनी तक्रार नोंदवल्यास पोलीस बलात्काराचा गुन्हा दाखल करतात. नागपूर जिल्हा पोलीस यंत्रणा या संबंधाने कमालीची संवेदनशील आहे. तक्रार मिळताच तत्परतेने तपास करून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याचे आणि सबळ पुरावे गोळा करून आरोपीला शिक्षा होईल, असे दोषारोपपत्र दाखल करायचे, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील प्रत्येक ठाणेदाराला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत गेल्या आठ महिन्यांत असे एकूण ५७ बलात्काराचे गुन्हे दाखल झालेत. त्यांच्या किंवा पालकांच्या तक्रारी मिळताच त्यातील ५६ प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केलेली आहे.
---
महिना बलात्कार अपहरण (पळवून नेणे)
जानेवारी २०२१ - ६ - १०
फेब्रुवारी - ८ - ५
मार्च - ६ - ७
एप्रिल - ५ - ६
मे - ८ - १४
जून - ११ - ८
जुलै - ४ - ८
ऑगस्ट - ९ - ११
----
गतवर्षीच्या तुलनेत घट
विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. गेल्या वर्षी बलात्काराचे ६१ गुन्हे दाखल झाले होते. या वर्षी (आठ महिन्यांत) ५७ गुन्हे दाखल झालेत.
---
गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाण
पोलिसांनी या वर्षी बलात्काराच्या एकूण ५७ पैकी ५६ अर्थात ९८ टक्के गुन्ह्यांची उकल केली. तर, नेण्याच्या ६९ पैकी ५४ अर्थात ७८ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांनी यश मिळवले आहे.
----