शिक्षणाचे सौंदर्य हे शिक्षकांतच
By Admin | Updated: September 6, 2014 03:05 IST2014-09-06T03:05:41+5:302014-09-06T03:05:41+5:30
शिक्षणाचे खरे सौंदर्य हे शिक्षकांमध्येच दडले आहे. जुन्या दिवसांपेक्षा शिक्षकांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, परंतु त्यांना जेवढा पगार मिळतो तितके ...

शिक्षणाचे सौंदर्य हे शिक्षकांतच
नागपूर : शिक्षणाचे खरे सौंदर्य हे शिक्षकांमध्येच दडले आहे. जुन्या दिवसांपेक्षा शिक्षकांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, परंतु त्यांना जेवढा पगार मिळतो तितके खरेच कार्य करतो का याचा विचार शिक्षकांनी करण्याची गरज आहे. शिक्षणक्षेत्राची दुरवस्था टाळणे हे शिक्षकांच्याच हातात असल्याचे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी दीक्षांत सभागृहात शिक्षकदिनानिमित्त उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
शिक्षक कल्याण निधीअंतर्गत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या सात शिक्षकांची निवड करण्यात आली होती. विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. शुभा जोहरी, सांख्यिकीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. माणिक खापर्डे, धनवटे नॅशनल कॉलेजचे डॉ. रत्नाकर भेलकर, एम.पी.देव स्मृती धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे डॉ.एन.एल.खोब्रागडे यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट संशोधक पुरस्कार विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अरुण जाधव यांना देण्यात आला. सामाजिक कार्यात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सामाजिक कार्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने शासकीय वसंतराव नाईक संस्थेचे डॉ. भाऊ दायदार यांना सन्मानित करण्यात आले. भंडारा येथील आर. एम. पटेल महाविद्यालयाच्या डॉ. जुल्फी शेख यांना उत्कृष्ट लेखक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, डॉ. पुरण मेश्राम व आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. अर्चना नेरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
शिक्षणक्षेत्रात गेल्या काही काळापासून आमूलाग्र बदल झाले आहेत. विद्यापीठांमध्ये संशोधनाला जास्तीत जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. संशोधन प्रक्रियेला विद्यापीठाने चालना दिली पाहिजे व विद्यार्थ्यांना त्याकडे जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. सोबतच समाजात शिक्षकांचे स्थान आदराचे कसे राहील यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत, असे मत डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक डॉ. नेरकर यांनी केले. संचालन डॉ. कोमल ठाकरे तर आभार डॉ. मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)