आयात शुल्कात कपातीनंतर खाद्यतेल स्वस्त नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:11 IST2021-08-26T04:11:18+5:302021-08-26T04:11:18+5:30
नागपूर : देशात खाद्यतेलाची होणारी दरवाढ थांबविण्यासाठी केंद्र सरकारने २० ऑगस्टला सोयाबीन आणि सूर्यफूल खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रत्येकी ७.५ ...

आयात शुल्कात कपातीनंतर खाद्यतेल स्वस्त नाहीच
नागपूर : देशात खाद्यतेलाची होणारी दरवाढ थांबविण्यासाठी केंद्र सरकारने २० ऑगस्टला सोयाबीन आणि सूर्यफूल खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रत्येकी ७.५ टक्के कपात केली. या कपातीमुळे किमती मोठ्या प्रमाणात कमी होतील आणि त्याचा ग्राहकांना फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण सक्रिय व्यापाऱ्यांच्या लॉबीमुळे १० रुपयांऐवजी ग्राहकांना ५ रुपयांचाच फायदा झाला. खाद्यतेलाच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण नसल्याने व्यापाऱ्यांचे फावत असल्याचा बाजारात सूर आहे.
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पाम खाद्यतेलावरील आयात शुल्कात १० टक्के कपात करून ३२ टक्के, तर २० ऑगस्टला सोयाबीन तेलात ७.५ टक्के कपात करून ७.५ टक्के आणि सूर्यफूल तेलाची ७.५ टक्के कपात केल्याने सध्या २७.५ टक्के आयात शुल्क झाले आहे. खाद्यतेलाच्या आयातीवरील ही सवलत ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर केलेली आहे. या सव्वा महिन्याच्या कालावधीत या सवलतीचा लाभ आयातदारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
ऐन सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. पण त्यात सरकार यशस्वी ठरले नाही. तेल विक्रेत्यानुसार खाद्यतेलाचे दर प्रति किलो १० रुपये किलोने कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण मिलमालक आणि ठोक विक्रेत्यांनी तोटा टाळण्यासाठी लॉबी तयार केली आणि खाद्यतेलाचे दर कमी होऊ दिले नाही, असा ग्राहकांचा आरोप आहे.
इतवारीतील सती माता एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल म्हणाले, विशेष म्हणजे देशात खाद्यतेलाची खरी मागणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणांच्या हंगामात खरी वाढते. या दिवसात किमती वाढलेल्या असतात. केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात केली, पण ऑर्डरनंतर विदेशातून माल येण्यास दीड महिना लागणार आहे. त्यानंतर किमती कमी होतील.
सध्या सणांचे दिवस आहेत. खाद्यतेलाची विक्री वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा समान आहे. ठोक विक्रेत्यांकडे पूर्वीचाच माल असल्याने त्यांनी किमती थोड्या प्रमाणात कमी केल्या आहेत. यंदा सोयाबीनचे पीक चांगले येण्याचा अंदाज आहे. नवरात्रीनंतर सोयाबीन बाजारात येईल. तोपर्यंत खाद्यतेलाच्या किमतीत घट होणार नाही. सध्या सर्व तेलाच्या किमती प्रति किलो ५ रुपयांनी कमी झाल्या आहेत. १५ किलो डब्यामागे ११० रुपये घसरणीची शक्यता असताना, केवळ ५० ते ६० रुपयांची घसरण झाली आहे. आयात शुल्कातील कपातीमुळे सणांमध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढल्या नाहीत, हे विशेष.
किरकोळमध्ये खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)
खाद्यतेल १० ऑगस्ट २५ ऑगस्ट
सोयाबीन १६१ १५६
सूर्यफूल १७५ १७०
शेंगदाणा १७० १६४
पाम १५५ १५०
जवस १८५ १८०
राईस ब्रान १६५ १६०
मोहरी १७५ १७०