पावसामुळे दीक्षाभूमीवर तारांबळ
By Admin | Updated: October 11, 2016 03:36 IST2016-10-11T03:36:00+5:302016-10-11T03:36:00+5:30
नागपूर : दीक्षाभूमी येथे ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशभरातील

पावसामुळे दीक्षाभूमीवर तारांबळ
नागपूर : दीक्षाभूमी येथे ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशभरातील अनुयायी दीक्षाभूमीवर दोन दिवसांपासून दाखल झाले आहेत. सोमवारी दुपारी अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे दीक्षाभूमीत तारांबळ उडाली. मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत आलेल्या अनुयायांनी पावसापासून वाचण्यासाठी स्मारकात आसरा घेतला. स्मारक समितीने डॉ. आंबेडकर महाविद्यालय, एमबीए, लॉ कॉलेजही उघडले होते. अर्धा तास झालेल्या या पावसामुळे दीक्षाभूमी परिसरात चांगलाच चिखल झाला आहे. पुस्तके, मूर्ती व विविध वस्तूंच्या स्टॉलसमोर चिखल साचल्याने अनुयायांना ये-जा करणे कठीण झाले होते. पाऊस थांबला परंतु चिखल कायम आहे. मुख्य समारंभाच्या ठिकाणीसुद्धा चिखल साचून आहे. त्यामुळे अनुयायांना दीक्षाभूमी परिसरात बसण्याची मोठी पंचाईत झाली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनतर्फे दीक्षाभूमी परिसरातील सर्व शाळांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाऊस आलाच तर अनुयायांची व्यवस्था महापालिकेच्या शाळेत करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
या शाळांमध्ये घेता येणार आसरा
लष्करीबाग मनपा शाळा
सुभाषनगर मनपा शाळा
वाल्मिकीनगर, गांधीनगर
रामदासपेठ दगडी पार्क
धरमपेठ, जलप्रदाय कार्यालयाजवळ
गोकुलपेठ
रविनगर