खड्ड्यांमुळे १० किमी रस्त्यासाठी पाऊण तासाचा वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST2020-12-13T04:26:16+5:302020-12-13T04:26:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्हीआयपी रोड समजल्या जाणाऱ्या नागपूर-कळमेश्वर मार्गावरून प्रवास हा आता जीवघेणा झाला आहे. या ...

Due to potholes, 10 km of road takes 15 minutes | खड्ड्यांमुळे १० किमी रस्त्यासाठी पाऊण तासाचा वेळ

खड्ड्यांमुळे १० किमी रस्त्यासाठी पाऊण तासाचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : व्हीआयपी रोड समजल्या जाणाऱ्या नागपूर-कळमेश्वर मार्गावरून प्रवास हा आता जीवघेणा झाला आहे. या मार्गावर आजवर अनेक अपघात झाले. यात काहींचा जीव गेला तर काहींना अपंगत्व आले. मात्र प्रशासन अद्यापही या मार्गाची दशा बदलविण्यास तयार नाही. नागपूरवरून जुन्या काटोल नाक्यापासून तर कळमेश्वर न.प.क्षेत्रात प्रवेश करेपर्यंत या मार्गावरून जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो. जागोजागी उखडलेल्या या रस्त्यामुळे व मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकी वाहनचालकाचा कधी तोल जाईल, याचा नेम नाही. सध्या १५ मिनिटात गाठता येणारे हे १० कि.मी.च्या अंतरासाठी ४० ते ४५ मिनिटाचा वेळ लागतो. यात चालकाला अतिरिक्त इंधनाचा भारही सोसावा लागतो. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या मार्गाला आता राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळाला आहे. मात्र या मार्गावरून जाताना एखाद्या अविकसित खेड्यातून प्रवास केल्याची अनुभुती येते.

वरुड, काटोलपर्यंत होणारी सर्व मोठी वाहतूक याच मार्गावरून होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी याच मार्गावरून जावे लागते. यासोबतच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना मतदार संघात जातांना याच मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही असे असताना या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे इतके दुर्लक्ष का हा प्रश्न नेहमीच केला जातो.

धोक्याचा प्रवास

वरुड-काटोलला जाणारी जड वाहने याच मार्गावरून जातात. त्यामुळे अरुंद रस्ता यातच दुतर्फा वाढलेल्या झाडीमुळे ओव्हरटेकच्या स्पर्धेत या मार्गावर अपघात वाढले आहे. गत १५ दिवसापूर्वी खड्डा वाचविण्याच्या नादात दहेगाव येथे झालेल्या कार अपघातात तीन लोकांचा जीव गेला. काही दिवसापूर्वीच या फेटरी परिसरात वलणी येथील पटवाºयाचा अपघाती मृत्यू झाला.

शैक्षणिक संस्थामुळे मोठी वर्दळ

नागपूर-कळमेश्वर-काटोल मार्गालगत गत १० वर्षात मोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या झाल्या आहे. यात पाचहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालये, पब्लिक स्कूल आणि खासगी शिक्षण संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे नागपूर शहरातून विद्यार्थ्यांना सकाळी त्यांच्या महाविद्यालयात वा शाळेत सोडण्यासाठी या मार्गावर कॉलेज आणि स्कूल बसची मोठी गर्दी असते. यातच या रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग गाठत गंतव्यस्थळापर्यंत पोहण्यासाठी चालकांमध्ये नेहमीच स्पर्धा दिसून येते. त्यामुळे सकाळच्यावेळी या मार्गावरून दुचाकीचा प्रवास नेहमीच धोक्याचा ठरतो.

कळमेश्वर-नागपूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त आहे. या मार्गावर अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात अनेकांचा जीव गेला. मात्र अधिकाऱ्यांचे अद्यापही डोळे बंद आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना या मार्गावरून सुखकर प्रवास करण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल?

-बाबा कोढे, प्रवासी

नागपूर-कळमेश्वर मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या महामार्गाची देखभाल दुरुस्ती वा इतर कोणत्याही प्रश्नाबाबत कार्यकारी अभियंता बोरकरच हेच योग्य ते सांगू शकतील.

- हृषिकेश राऊत, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कळमेश्वर

Web Title: Due to potholes, 10 km of road takes 15 minutes