स्वतंत्र विदर्भासाठी नाट्य कलावंतांचा पुढाकार
By Admin | Updated: June 19, 2014 00:57 IST2014-06-19T00:57:43+5:302014-06-19T00:57:43+5:30
वेगळ्या विदर्भासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोक चळवळ चालवितात. पण यात आता नाट्य कलावंतांनीही सहभाग घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी नाट्य कलावंतांचा एक मेळावा २२ जून रोजी

स्वतंत्र विदर्भासाठी नाट्य कलावंतांचा पुढाकार
जनमंचचे आयोजन : २२ जूनला नागपुरात मेळावा
नागपूर : वेगळ्या विदर्भासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोक चळवळ चालवितात. पण यात आता नाट्य कलावंतांनीही सहभाग घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी नाट्य कलावंतांचा एक मेळावा २२ जून रोजी संघी भवन, काँग्रेसनगर येथे दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यात संपूर्ण विदर्भातील नाट्य कलावंत एकत्रित येऊन वेगळ्या विदर्भाची मागणी करणार आहेत. जनमंच या सामाजिक संस्थेने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीशी कलावंतांचा काय संबंध, असा प्रश्न स्वाभाविकपणे लोकांच्या मनात येतो. पण विदर्भाच्या विकासासाठी सर्वांगीण विकास आवश्यक आहे. यात कला, कलावंत आणि कला क्षेत्राचा विकासही अपेक्षित आहे. संयुक्त महाराष्ट्रात हा विकास खुंटला आहे. कला ही समाजाच्या बाहेरची बाब नाही. सामाजिक भान जपल्याशिवाय लेखक, कलावंतही घडत नाही. त्यामुळेच कलेचा विकास साधण्यासाठी आणि सामाजिक भान जपण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडींचा परिणाम कला आणि कलावंतांवर होत असतो. विदर्भाची संस्कृती वेगळी आहे. इथली बोलीभाषा, लोककला, कलांचे झाडीपट्टी महोत्सव हे सारे वेगळे आहे. वैदर्भीय कलेला, कलावंताला आणि लेखनाला, अभिनयाला मुंबईचे प्रमाणपत्र आवश्यक झाले आहे. मालवणी-कोकणी, पश्चिम महाराष्ट्राची प्रमाणभाषा विदर्भावर लादल्या जाते आहे. त्या तुलनेत वऱ्हाडी, झाडीबोली समृद्ध असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. येथील शेतीकडे, विविध समाजाकडे आणि नाट्य महोत्सव व कलांकडे मुंबईत दुर्लक्ष केले जाते. येथील कलावंतांचा सत्कार होत नाही. झाडीपट्टीत आजपर्यंत एकही मुख्यमंत्री आलेला नाही. त्यामुळेच आता अन्याय सहन करणार नाही, अशी भूमिका कलावंतांनी घेतली आहे. कलावंतांनी आतापर्यंत क्रांतीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. जनजागृतीसाठी पथनाट्ये, कविता, लेखन यांनीच महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यामुळेच वेगळ्या विदर्भासाठी आता कलावंतांनीही कंबर कसली आहे. सत्तेच्या राजकारणापलिकडे जाऊन विदर्भासाठी सांस्कृतिक चळवळ उभारण्याचा निर्णय आता कलावंतांनी घेतला आहे.
या मेळाव्यात सर्व कलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिग्दर्शक हरीश इथापे, श्याम पेठकर, देवेंद्र लुटे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)