आत्महत्येनंतरही संकटाचं ओझं!
By Admin | Updated: June 28, 2015 03:04 IST2015-06-28T03:04:46+5:302015-06-28T03:04:46+5:30
वाठोडा येथील विजय नावाचा शेतकरी जीवनाची लढाई लढत असताना त्याचा त्यात पराभव झाला.

आत्महत्येनंतरही संकटाचं ओझं!
बँकेची कर्जवसुलीसाठी नोटीस : धुणीभांडी करतेय शेतकऱ्याची पत्नी
वसीम कुरेशी नागपूर
वाठोडा येथील विजय नावाचा शेतकरी जीवनाची लढाई लढत असताना त्याचा त्यात पराभव झाला. परंतु त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाचे कष्ट कमी झाले नाही. त्याचे कुटुंब आता अनेक संकटांचा सामना करीत आहे. शासनाच्या दफ्तरी शेतकरी आत्महत्येचा उल्लेख करण्यात आला. मात्र त्याचा लाभ त्याच्या कुटुंबास काहीच झाला नाही.
काही वर्षांपूर्वी कामठी तालुक्यातील टेमसना येथे आपली साडेसात एकर जमिनीत शेती करून विजय नावाचा शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याला कर्ज घ्यायची गरजही पडली नाही. तीन वर्षांपूर्वी हवामानाने साथ न दिल्यामुळे त्याच्या शेतात नापिकी झाली. त्यानंतर त्याने २०१३ मध्ये आशेपोटी बँकेकडून १ लाख १३ हजार ८०० रुपयांचे कर्ज घेतले. त्याच्या शेतात पीक तर आले परंतु अतिवृष्टीमुळे ते वाया गेले. कर्जाच्या चिंतेमुळे विजयने १७ एप्रिल २०१४ रोजी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यामुळे नवव्या वर्गात असलेल्या त्याच्या अमोल नावाच्या मुलास काम करणे भाग पडले.
त्याची आई माला विजय नरड ही सुद्धा दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करू लागली.परंतु विजयची आत्महत्या शासनाच्या दफ्तरी केवळ आत्महत्या म्हणूनच राहिली.
मुलाचे शिक्षण पूर्ण व्हावे
कमी वयात पतीचा मृत्यू झाला. मुलांचा सांभाळ करताना संकटांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शासकीय कार्यालयाच्या चकराही माराव्या लागत आहेत. इतके दु:ख सोसले, यापुढेही दु:ख झेलण्याची तयारी आहे. अशा स्थितीत शासनाकडून मदत मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे मदत मिळाल्यास कर्ज फेडण्यास मदत होऊन मुलांचे शिक्षण तरी पूर्ण होईल, अशी अपेक्षा माला विजय नरड यांनी व्यक्त केली.
अनेक शेतकरी आत्महत्यांची नोंदच नाही
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या अनेक प्रकरणांची शासनाकडे नोंदच नाही. शेतकऱ्यांच्या विरुद्ध षडयंत्र सुरू आहे. आता गाव शेतकऱ्यांचे राहिलेले नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. त्याने लावलेले पैसेही वसूल होत नाहीत. त्यात हवामानाची साथ मिळत नाही आणि सध्याचा जमीन अधिग्रहण कायदा इंग्रजांच्या शासनापेक्षाही घातक आहे.
-संजय सत्यकार, शेतकरी नेता