प्रभागाची आखणी की विरोधकांची कापणी?
By Admin | Updated: June 6, 2016 03:00 IST2016-06-06T03:00:55+5:302016-06-06T03:00:55+5:30
महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याचे शासकीय परिपत्रक जारी झाल्याने संभाव्य

प्रभागाची आखणी की विरोधकांची कापणी?
कमलेश वानखेडे ल्ल नागपूर
महापालिकेची आगामी निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याचे शासकीय परिपत्रक जारी झाल्याने संभाव्य प्रभागांची रचना करण्यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. ही जबाबदारी पूर्णपणे प्रशसनाच्य हाती असली तरी राज्य व महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपनेते प्रशासनाला अप्रत्यपक्षपणे हाताशी धरून विरोधी सदस्य अडचणीत येतील, अशी प्रभाग रचना करतील, असा धोका विरोधकांना वाटत आहे. त्यामुळे विरोधक या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असून असे काही घडले तर त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे.
महापालिकेत चार सदस्यीय प्रभागाची आखणी करताना लोकसंख्या, भूप्रदेश, नैसर्गिक सीमा, मुख्य रस्ते आदी निकष पाळावे लागणार आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेले दोन सलग प्रभाग जोडून एक नवा चार सदस्यीय प्रभाग तयार केला जाण्याची शक्यता कमीच आहे. दोन सलग प्रभाग जोडतानाही निकषांची पूर्ती करताना त्यात बरेच फेरबदल केले जातील. या फेरबदलात काँग्रेससह विरोधी सदस्य असलेल्या प्रभागांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून ‘गेम’ केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एखाद्या प्रभागातील एखाद्या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपाच्या उमेदवाराला एकतर्फी मते मिळाली असतील तर नेमका तेवढा भाग शेजारच्या भाजपबहुल प्रभागाशी जोडता येईल का, याची भाजपकडून चाचपणी केली जाईल व शक्य असेल तेथे तसे केलेही जाईल, अशी काँग्रेसला शंका आहे. एकदा प्रभाग रचनेचा आराखडा तयार झाला की नंतर त्यावर आक्षेप व सूचना मागविल्या जातात. मात्र, सुनावणी नंतरही त्यात फारसा काही बदल होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे आतापासूनच प्रभाग रचना करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर लक्ष ठेवण्याची रणनीती काँग्रेससह विरोधी पक्षांनी आखली आहे.
कमी फरकाचे प्रभाग
भाजपसाठीही अडचणीचे
सध्याची प्रभाग रचना व विजयी झालेले नगरसेवक पाहता महापालिकेची अपेक्षित प्रभाग रचना करवून घेणे भाजपसाठी वाटते तेवढेही सोपे नाही. दोन प्रभाग एकमेकांना जोडताना काही भागात भाजपच्याही विद्यमान नगरसेवकांना फटका बसण्याची शक्यता आहे. २०० मतांहून कमी फरकाने भाजपचे काही नगरसेवक विजयी झाले आहेत. त्याच्या शेजारच्या प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बसपाने बाजी मारली आहे. त्यावेळी मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला होता. आता मात्र, प्रभागाची सीमा वाढणार असल्यामुळे तेवढे मतविभाजन होणार नाही. याचा फटका कमी मतांनी जिंकलेल्या भाजप नगरसेवकांना बसण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या मतांवर भाजपचे गणित
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक मतदारसंघाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे निवडणुकीला मोठे स्वरूप येणार आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारावर भाजपने विजयाचे गणित आखले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांची आकडेवारी पाहता सलग दोन प्रभागातील भाजपची मते एकत्र केली तर ६० टक्के जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होऊ शकतात. विधानसभेच्या आकडेवारीने भाजपने मनोबल उंचावले असून त्यामुळे भाजप नेते निश्चिंत आहेत.