आरोपीने सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन दिले असेल, तरच बलात्काराचा गुन्हा लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 20:50 IST2021-10-22T20:49:31+5:302021-10-22T20:50:12+5:30
Nagpur News आरोपीने महिलेला फसविण्याच्या उद्देशाने सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक संबंध प्रस्थापित केले तरच, बलात्काराचा गुन्हा लागू होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

आरोपीने सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन दिले असेल, तरच बलात्काराचा गुन्हा लागू
नागपूर : आरोपीने महिलेला फसविण्याच्या उद्देशाने सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक संबंध प्रस्थापित केले तरच, बलात्काराचा गुन्हा लागू होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले, तसेच या निकषात बसत नसलेला वादग्रस्त एफआयआर रद्द केला. (The crime of rape is applicable only if the accused has made a false promise of marriage from the very beginning)
न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. एका महिलेच्या तक्रारीवरून मुश्ताक शेख या आरोपीविरुद्ध बलात्काराचा वादग्रस्त एफआयआर नोंदविण्यात आला होता. तक्रारकर्ती महिला घटस्फोटित असून तिला दोन मुले आहेत. २०१४ मध्ये ती आरोपीच्या संपर्कात आली होती. दरम्यान, ते एकमेकांवर प्रेम करायला लागले. २९ डिसेंबर २०१५ रोजी आरोपीने गुंगीचे पेय पाजून महिलेवर बलात्कार केला व त्यानंतर तिला लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे महिलेने आरोपीसोबतचे लैंगिक संबंध पुढेही सुरू ठेवले.
काही दिवसांनी आरोपीने लग्न करण्यास नकार दिला, अशी पोलीस तक्रार होती. उच्च न्यायालयाने अशा प्रकरणामध्ये बलात्काराचा गुन्हा लागू होण्यासाठी आरोपीने सुरुवातीपासूनच लग्नाचे खोटे वचन देणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले. न्यायालयाला या प्रकरणात असा आरोप कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे हा गुन्हा कायम ठेवल्यास कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग होईल, असे न्यायालयाने नमूद करून आरोपीची एफआयआर रद्द करण्याची याचिका मंजूर केली.