परिवर्तनासाठी निकोप समाज निर्माण करा
By Admin | Updated: June 16, 2014 01:07 IST2014-06-16T01:07:32+5:302014-06-16T01:07:32+5:30
देशात सर्वत्र आता सकारात्मक परिवर्तन दिसू लागले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारतच जगाला आपल्या संस्कृतीच्या आधारावर मार्गदर्शन करू शकतो, अशी स्थिती आहे.

परिवर्तनासाठी निकोप समाज निर्माण करा
शांताक्का : राष्ट्र सेविका समितीच्या प्रवीण वर्गाचा समारोप
नागपूर : देशात सर्वत्र आता सकारात्मक परिवर्तन दिसू लागले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारतच जगाला आपल्या संस्कृतीच्या आधारावर मार्गदर्शन करू शकतो, अशी स्थिती आहे. पण परिवर्तन करायचे असेल तर कुणावर विसंबून चालणार नाही. स्त्रियांमध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे. आपल्या संस्कृतीत तर स्त्री शक्ती स्वरूपातच पाहिली गेली आहे. या शक्तीचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी आपण केला पाहिजे. याचा प्रारंभ आपल्या घरापासून करा आणि राष्ट्रापर्यंत व्यापक करा, असे आवाहन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यांनी रविवारी केले.
राष्ट्र सेविका समितीच्या प्रवीण वर्गाचा समारोप आज शक्तीपीठ, रामनगर येथे करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला आयुर्वेदाचार्य शार्दुली तेरवाडकर आणि राजश्री जानी प्रामुख्याने उपस्थित होत्या. शांताक्का म्हणाल्या, सामाजिक आरोग्यासाठी उपाय शोधताना डॉ. हेडगेवार यांनी संघटन शक्तीचा उपयोग केला. संघटनेतून व्यक्तीनिर्माणाचा यज्ञ त्यांनी सुरू केला. त्यानंतर स्त्रियांनाही या कार्यात सहभागी करून घेताना १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची निर्मिती झाली. तेव्हापासून स्त्रियांना सक्षम आणि जागरूक करण्याचा प्रयत्न समितीतर्फे करण्यात येत आहे. परिवर्तन कुणीतरी वेगळा माणूस करीत नसतो. परिवर्तनाचा प्रारंभ आपल्यापासूनच करावा लागतो. त्यासाठी आपल्या विचारांवर कृती आणि कृतीत समर्पण असावे लागते. त्याशिवाय परिवर्तन होत नाही. एक माता संपूर्ण कुटुंबाला संस्कारित करू शकते. आपण माता, भगिनी आहोत. त्यामुळे किमान आपले घर नंतर समाज आणि त्यानंतर राष्ट्र असा प्रवास आपण करायला हवा. हे काम सातत्याने सुरू आहे. यासाठी आपले घर संस्कारित करण्यापासून सुरुवात करा, राष्ट्र संस्कारित होईल, असे शांताक्का म्हणाल्या. याप्रसंगी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या शार्दुली तेरवाडकर यांनी समितीच्या सदस्यांना उद्बोधन केले. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी सामाजिक बांधिलकी जपता येते. हा विचार मनात असला तर प्रत्येक क्षेत्रात मोठे काम उभे राहू शकते, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाला प्रशिक्षित समिती सदस्य उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)