कोरोनाने वाढविली अभियांत्रिकी महाविद्यालयांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 07:00 IST2020-04-29T07:00:00+5:302020-04-29T07:00:13+5:30

यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे.

Corona raises concerns for engineering colleges | कोरोनाने वाढविली अभियांत्रिकी महाविद्यालयांची चिंता

कोरोनाने वाढविली अभियांत्रिकी महाविद्यालयांची चिंता

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसाधारणत: बारावीच्या परीक्षा आटोपल्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयाकंडून पुढील शैक्षणिक सत्रातील नव्या प्रवेशांसाठी तयारी सुरू होते. महाविद्यालयांचा भर व्यवस्थापन कोट्याच्या जागा भरण्यावर असतो व त्यासाठी बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यावर भर असतो. परंतु यंदा कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाविद्यालय प्रतिनिधींना बाहेर जाऊन थेट मार्केटिंग करण्याची संधीच मिळालेली नाही. अगोदरच दरवर्षी रिक्त जागांचे महाविद्यालयांसमोर आव्हान असते. अशा स्थितीत कोरोनामुळे महाविद्यालयांची चिंता आणखी वाढली आहे.

‘कॅप’च्या अंतर्गत विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांनाच जास्त प्राधान्य देतात. हीच बाब लक्षात घेता व्यवस्थापन ‘कोटा’मधून मिळतील तितके प्रवेश करण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न असतो. या जागा जास्तीत जास्त प्रमाणात कशा भरतील यासाठी काही महाविद्यालयांकडून बारावीच्या परीक्षेला एक ते दीड महिन्याचा अवकाश असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बैठकांचा जोर सुरू झाला होता. रिक्त जागांचे प्रमाण कमी करून प्रवेश कसे वाढतील या मुद्यावरच या बैठकांमध्ये जोर देण्यात आला. दरवर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच परीक्षांच्या अगोदरच ‘मार्केटिंग’ कसे करता येईल यासंदर्भात चाचपणीदेखील झाली होती. मात्र अचानकपणे मार्च महिन्यात लॉकडाऊन लागला आणि महाविद्यालयांच्या आराखड्यावर पाणी फेरल्या गेले. मागील वर्षी ४० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त होत्या. नागपुरातील तर काही मोजक्या महाविद्यालयांतच ८० टक्क्यांहून अधिक प्रवेश झाले होते. त्यामुळे आता व्यवस्थापन कोट्याच्या जागा कशा भरायच्या व बाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचायचे, हा प्रश्न महाविद्यालय प्रशासनांसमोर पडला आहे.

ऑनलाईन संपर्कावरच भर
गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांचे प्रतिनिधी विद्यार्थी शोधण्यासाठी चक्क उत्तर भारतातील बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेताना दिसून आले. सोबतच विद्यार्थ्यांना विविध ऑफर्सदेखील देण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे आता ऑनलाईन संपर्कावरच भर आहे. काही महाविद्यालयांनी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाºया बाहेरील राज्यांतील शिकवणी वर्गांच्या चालकांशी संपर्क साधला आहे, अशी माहिती या प्रक्रियेत असणाºया एका महाविद्यालय प्रतिनिधीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

 

Web Title: Corona raises concerns for engineering colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.