पाणवठ्यांवर ठणठणाट - वन्यजीव तहानलेले एनटीसीएच्या सूचना : हळूहळू पाणवठे बंद करा
By Admin | Updated: May 10, 2014 00:37 IST2014-05-10T00:37:30+5:302014-05-10T00:37:30+5:30
नागपूर ंव्याघ्र प्रकल्पालगत असलेले कृत्रिम पाणवठे हळूहळू बंद करण्याच्या सूचना केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिल्याने...

पाणवठ्यांवर ठणठणाट - वन्यजीव तहानलेले एनटीसीएच्या सूचना : हळूहळू पाणवठे बंद करा
गजानन चोपडे - नागपूर ंव्याघ्र प्रकल्पालगत असलेले कृत्रिम पाणवठे हळूहळू बंद करण्याच्या सूचना केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) दिल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पाणवठ्यांवर ठणठणाट आहे. असे केल्यास बाहेरील वन्यजीव पाण्याच्या शोधात प्रकल्पात शिरतील, असा जावईशोध प्राधिकरणाने लावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मानव-प्राणी संघर्ष थांबावा, पाण्याच्या शोधात वन्यजीवांनी लोकवस्तीकडे येऊ नये, यासाठी प्रकल्पालगत रस्त्याच्या कडेला कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहेत. उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू लागताच यात पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र यंदा हे पाणवठे कोरडेठाक असल्याने अनेक वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत अनेकांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जी.पी. गरड यांना एसएमएसद्वारे आपली प्रतिक्रियादेखील नोंदविली आहे. ताडोबाच्या बफर झोनमध्ये ७० तर कोअर झोनमध्ये १०८ पाण्याचे नैसर्गिक स्रोत असल्याने कृत्रिम पाणवठे बंद करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वाघ किंवा बिबटसारखे हिंस्त्र प्राणी बाहेरून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येत असल्याचा दावा प्रकल्प व्यवस्थापनाने केला आहे. असे असले तरी तहान भागविण्यासाठी वन्यजीव मोठ्या संख्येने कृत्रिम पाणवठ्यांवर येतात आणि त्यात पाणी नसल्याने लोकवस्तीच्या दिशेने जातात. २१ एप्रिल रोजी बल्लारपूर येथील संतोषी माता वॉर्ड या गजबजलेल्या वस्तीतील एका घरात भरदिवसा एक बिबट्या शिरला. त्याने घरातील महिलेवर हल्ला चढवून तिला जखमी केले. मानेकडे जाणारा बिबट्याचा पंजा त्या महिलेने मोठ्या हिमतीने दूर सारला. बघ्यांची गर्दी ही झुंज श्वास रोखून पाहात होती. महिलेने पूर्ण शक्तिनिशी बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. मोठा अनर्थ टळला. अन्यथा गावात अनेकांना त्याने जखमी केले असते. दर उन्हाळ्यात बिबट गावात शिरल्याच्या घटना ऐकू येतात. मानव- वन्यजीव संघर्षांत आजतागायत अनेकांचा बळी गेला आहे. पण वन विभाग या बाबीकडे हवे त्याप्रमाणात लक्ष देत नसल्याची खंत वन्यजीवप्रेमी निखिल तांबेकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, फक्त वाघ आणि बिबटचाच विचार करून चालणार नाही तर कृत्रिम पाणवठ्यांवर इतर प्राणीही येतात, हे वन विभागाने लक्षात घ्यायला हवे. ताडोबातील कोळसा, तेलिया, पांढरपवनी या तलावांमध्ये मुबलक जलसाठा असला तरी कृत्रिम पाणवठ्यांमधील स्थिती भीषण पाणी टंचाई दर्शविणारी आहे.