राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या नाऱ्याने काँग्रेस सावध ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST2021-02-05T04:51:59+5:302021-02-05T04:51:59+5:30

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. ...

Congress warns of NCP's self-reliance () | राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या नाऱ्याने काँग्रेस सावध ()

राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या नाऱ्याने काँग्रेस सावध ()

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. यासाठी शहरभर बैठका सुरू केल्या आहेत.

यामुळे काँग्रेसही सावध झाली आहे. गेल्या निवडणुकीत स्वबळावर राष्ट्रवादीचे बारा वाजले होते. जेमतेम एक नगरसेवक निवडून आला, याचे स्मरण काँग्रेसने करून दिले आहे. तर राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय काँग्रेसलाही सत्तेचा झेंडा रोवता आला नाही, याची आठवण राष्ट्रवादीनेही करून दिली आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा काढला. नागपुरात दोन दिवस विधानसभानिहाय आढावा बैठक घेतली. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक वॉर्डात बूथ पातळीवर संघटन बळ‌कट करण्याचे निर्देश देत स्वबळवर लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. सोबतच पाहिजी ती मदत करू, असे सांगत ‌निवडणुकीसाठी लागणारी ‘रसद’ पुरविण्याचीही तयारी दर्शविली. पाटील यांच्या या आदेशानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे, तर काँग्रेसच्या ही बाब जिव्हारी लागली आहे.

गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडीसाठी चर्चेच्या फेऱ्या झाल्या. मात्र, ऐनवेळी किती जागा सोडायच्या, या आकड्यावरून आघाडीत बिघाडी झाली. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. काँग्रेसला फक्त २९ जागांवर समाधान मानावे लागले. चार सदस्यीय प्रभागात राष्ट्रवादीची ताकद पुरली नाही. जेमतेम एक नगरसेवक निवडून आला. दोघांच्या भांडणात भाजपचा फायदा झाला व शतक पार करीत महापालिकेवर पुन्हा एकदा कमळ फुलले होते. राष्ट्रवादीकडून राज्यात नंबर १ असल्याचा दावा नेहमी केला जातो. मात्र, नागपूर महापालिकेत एकच नगरसेवक असल्यामुळे राष्ट्रवादीला नंबर १ वरून सारखे टोमणे सहन करावे लागतात. यावेळी हा डाग पुसण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड सुरू आहे. पण व्होटबँक एकच असल्यामुळे राष्ट्रवादीच्या या मार्गात काँग्रेसच मुख्य अडथळा ठरत आहे. सध्यस्थितीत दोन्ही पक्षाचे नेते उघडपणे एकमेकांविरोधात बोलणे टाळत असले, तरी आतून धुसफूस सुरू असल्याचे चित्र आहे.

वॉर्ड पद्धतीमुळे राष्ट्रवादी जोशात

- आगामी निवडणूक ही प्रभाग नव्हे, तर वॉर्ड पद्धतीने होणार आहे. क्षेत्र कमी झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या आशा उंचावल्या आहेत. सक्षम उमेदवार व आवश्यक पाठबळ दिले की वॉर्डात निकाल बाजूने लागू शकतो.

त्यामुळे आता आपल्याला निवडणुकीत काँग्रेसच्या आधाराची फारशी गरज नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस बूथ पातळीवर मजबूत असल्यामुळे राष्ट्रवादीला बूथवर बसायलाही कार्यकर्ते मिळ‌णार नाहीत, असा दम काँग्रेसकडून भरला जात आहे. थोडक्यात भविष्यात या दोन्ही पक्षात संघर्ष अटळ आहे.

Web Title: Congress warns of NCP's self-reliance ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.