कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 07:00 IST2021-09-24T07:00:00+5:302021-09-24T07:00:02+5:30
Nagpur News राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्र संवेदनशील स्थितीत पोहोचले आहेत.

कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती
कमल शर्मा
नागपूर : राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्र संवेदनशील स्थितीत पोहोचले आहेत. परिस्थिती इतकी भीषण आहे की, राज्यातील चार युनिटचे उत्पादन कोळसा नसल्याने ठप्प पडले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक ६ सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद होऊ शकतो. (Coal crisis in power stations in the state; Only two days stock available)
तीन दिवसापेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्वच वीज केंद्र सध्या या श्रेणीत आले आहेत. महाजेनकोच्या सूत्रानुसार, सर्वाधिक कोळशाचा पुरवठा वेकोलिकडून होतो. परंतु मागील अनेक दिवसापासून अपेक्षित १८ रॅकऐवजी केवळ १० रॅकचा पुरवठा होत आहे. सर्व कोळसा कंपन्यांमधून दररोज २५ रॅक कोळशाचा पुरवठा अपेक्षित असतो. परंतु सध्या सरासरी १८ रॅक मिळत आहेत. यामुळे वीज केंद्रांमधील स्टॉक कमी होत चालला आहे. सूत्रांचा असा दावा आहे की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माेठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कोळसा उत्पादन प्रभावित झाले. वाहतुकीतही समस्या येत आहे. त्यामुळे स्टॉक कमी कमी होत चालला आहे. आता परिस्थिती अशी आहे की रोजच्या पुरवठ्यावर सर्वकाही अवलंबून आहे. गुरुवारी विजेची मागणी १८,०३७ मेगावॅट इतकी होती. ही मागणी पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. परंतु भविष्यात संकट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
-बंद पडले युनिट
कोळसा नसल्याने राज्यातील औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद पडले आहेत. यात चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ४, नाशिक येथील युनिट क्रमांक ५ व खापरखेडा येथील युनिट क्रमांक १ व २ यांचा समावेश आहे. कोराडीतील एक युनिट आपात्कालीन कारणांमुळे बंद आहे. येतील एक युनिट कोळशाअभावी कधीही बंद पडू शकतो.
- एनटीपीसी, खासगी क्षेत्रही प्रभावित, गॅसचाही तुटवडा
कोळसा संकटामुळे मौदा येथील एनटीपीसी औष्णिक वीज केंद्रातील एक युनिटही ठप्प पडले आहे. खासगी क्षेत्रही प्रभावित झाले आहे. अदानी तिरोडा वीज केंद्रातील उत्पादन कमी झाले आहे. तर रतन इंडियाचे एक युनिट व सीजीपीएलचे दोन युनिट बंद करावे लागले. दुसरीकडे गॅसआधारित उरण प्रकल्पातील एक युनिट गॅस उपलब्ध नसल्याने बंद आहे.