अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणारच, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By योगेश पांडे | Updated: February 12, 2024 00:02 IST2024-02-12T00:02:03+5:302024-02-12T00:02:38+5:30
अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत करण्यात येईल, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणारच, मुख्यमंत्र्यांची घोषणा
नागपूर : राज्यातील अनेक भागांना गारपीट व अवकाळी पावसाने झोपडले असून यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत करण्यात येईल, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रामटेक येथे मेळाव्यासाठी आले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री नागपुरात आले असतानाच विदर्भातील अनेक भागात जोरदार गारपीट झाली. अगदी मुख्यमंत्र्यांच्या मार्गावरील काही गावांनादेखील पावसाने झोडपले. शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता त्यांनी शासनाची भूमिका मांडली. हे सरकार बळीराजाचे आहे.
शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहे. त्यात नुकसानभरपाई, एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत, दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर करणे, पीक विमा एक रुपयात देणे यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना सरकारने कधीही हात आखडता घेतलेला नाही. आता जी गारपीट व अवकाळी पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक मदत मिळेल, सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.