छत्रपती शिवाजी महाराजांंची युद्धनीती म्हणजेच युद्धमंत्र : राहुल सोलापूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 23:00 IST2019-10-02T22:57:39+5:302019-10-02T23:00:21+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांनी योजिलेल्या सर्व क्लृप्त्या म्हणजे युद्धनीतीचा एक मंत्रच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता आणि शिवव्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांंची युद्धनीती म्हणजेच युद्धमंत्र : राहुल सोलापूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युद्धनीती शिकविली जाऊ शकते, याची जाणीव लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये जगभरातील सैनिकांना दिल्या जात असलेल्या शिक्षणावरून झाली. आपल्याकडे मात्र, त्याबाबत बरीच उदासीनता आहे. लंडन आणि न्यूयॉर्क येथील ‘वॉर म्युझियम’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाशी दिलेल्या झुंजीला सर्वोत्तम स्थान देऊन, त्याचा अभ्यास केला जातो. या युद्धात महाराजांनी योजिलेल्या सर्व क्लृप्त्या म्हणजे युद्धनीतीचा एक मंत्रच असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता आणि शिवव्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी आज येथे केले.
लोकमत आणि राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने पूर्व लक्ष्मीनगर येथील व्हॉलिबॉल पटांगणात आयोजित ‘नागपूर दुर्गा महोत्सव २०१९’मध्ये बुधवारी सोलापूरकर यांनी ‘प्रतापगड : एक मंत्रयुद्ध’ या विषयावरील व्याख्यान गुंफले. यावेळी, मंडळाचे अध्यक्ष प्रसन्ना मोहिले उपस्थित होते.
शिवरायांचे गुरु कोण, हा प्रश्न उपस्थित करत, वर्तमानात सुरू असलेल्या वादावर त्यांनी आपले अभ्यासपूर्ण विवेचन केले. संत तुकाराम की समर्थ रामदास, यापैकी कोण गुरु, या वादात गुरफटण्यापेक्षा तुकाराम व रामदास यांच्यामधे असलेले शिवराय, अशा त्रिवेणी संगमातूनच स्वराज्याचा जन्म झाला, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल, असे सोलापूरकर यावेळी म्हणाले. स्वराज्याच्या २४ पट असलेली आदिलशाही आणि आदिलशाहीच्या ३१ पट असलेल्या मोगलांसोबत शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्त्व महाराजांच्या युद्धनीतीमध्ये दडले आहे. प्रचंड फौजेनिशी अफजल जेव्हा स्वराज्यावर चालून आला आणि स्वराज्याची राखरांगोळी केली. तुळजापूरची भवानी फोडली, पंढरपूर बाटवले. मात्र, अशा परिस्थितीत महाराजांनी कच खाल्ली नाही. प्रचंड संयम बाळगला आणि मावळ्यांचे मनोधैर्य खचू दिले नाही. उलट, अशा काळात त्यांनी शाहिस्तेखान आणि अफजल खानामध्ये सौम्य वितुष्ट निर्माण करत, त्यांनाच त्यांच्यात गुरफटत ठेवले. त्याचा लाभ आक्रमणामुळे निर्माण झालेल्या भीतीला सावरण्यात घेतला आणि अफजलला आपल्या कैचीत पकडून त्याचा नायनाट केला. या संपूर्ण अभ्यासात महाराजांनी प्रचंड धैर्य बाळगून भविष्यासाठी मंत्रयुद्धाची नांदीच दिल्याचे राहुल सोलापूरकर यावेळी म्हणाले.
चिमुकल्या स्पर्धकांना पुरस्कारांचे वितरण
मंगळवारी पार पडलेल्या सांस्कृतिक स्पर्धांच्या विजेत्यांना राहुल सोलापूरकर व रेणुका मोहिले यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. त्यात आरोही गान, स्निग्धा वाघमारे, मिहीर जैस्वाल, रिया राणे, प्रशंसा, स्वराली कुळकर्णी, नव्या महाजन, माही भांबलकर, वरालिका गांजापुरे, आर्या जलतारे, साकेत ठाणेकर, अनन्या पंडित, अत्रेयू कजगीकर, श्रेया समृतवार, सानिया चक्रवर्ती, अनिका बॅनर्जी, पूर्वा मानकर यांचा समावेश होता. तर, लक्ष्मीनगर गु्रप डान्स व सुपर गर्ल्स यांनाही यावेळी पुरस्कृत करण्यात आले.