विधानसभेच्या काही जागांमध्ये बदल शक्य
By Admin | Updated: June 15, 2014 00:34 IST2014-06-15T00:34:15+5:302014-06-15T00:34:15+5:30
येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहील, अशी आशा व्यक्त करून काही जागांमध्ये मात्र अदलाबदल होण्याची शक्यता राष्ट्रवादी

विधानसभेच्या काही जागांमध्ये बदल शक्य
पटेलांचे सुतोवाच : लवकरच रणनीती
गोंदिया : येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहील, अशी आशा व्यक्त करून काही जागांमध्ये मात्र अदलाबदल होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली.
राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच गोंदियात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीतील आघाडी पक्षांच्या पराभवापासून तर आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी दिलखुलास चर्चा केली.
आगामी निवडणुकीबद्दलची रणनिती लवकर ठरणार असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने किती जागा लढवायच्या आणि कोणकोणत्या जागा लढवायच्या हे अजून निश्चित झालेले नसल्याचे खा.पटेल म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राकाँ आघाडीतील पक्षांना हार पत्करावी लागली असली तरी विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र राहू शकते. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने आघाडीतील पक्षांच्या उमेदवारांची हार झाली ते अपेक्षित नव्हते. मात्र राष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीने केंद्र सरकारविरूद्ध भ्रष्टाचार, अकार्यक्षमता व महागाईच्या मुद्यावरून दोन ते तीन वर्षांपासून मोहीम चालविली जात होती, त्याला वेळीच उत्तर द्यायला पाहीजे होते. वास्तविक परिस्थिती वेगळी असताना काँग्रेसबहुल सरकारने त्यावर स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ केल्यामुळे खरी बाजू जनतेसमोर आलीच नाही आणि जे आरोप होतात त्यालाच खरे समजून लोकांनी आपली मानसिकता तयार केली, असे खा.पटेल यावेळी म्हणाले. नवीन सरकारकडून लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. परंतू हे सरकार युपीए सरकारपेक्षा वेगळे काहीतरी करेल आणि विकासगंगा खेडोपाडी पोहोचवेल असे काहीही होण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)