उमरेडमध्ये बंडखोर वाढविणार प्रमुख उमेदवारांचे ‘हार्टबिट’
By Admin | Updated: June 11, 2014 01:12 IST2014-06-11T01:12:37+5:302014-06-11T01:12:37+5:30
अनुसूचित जाती (एस.सी.) साठी राखीव असलेल्या उमरेड विधानसभा मतदारसंघातून २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून ही जागा भारतीय जनता पक्षाने हिसकावली.

उमरेडमध्ये बंडखोर वाढविणार प्रमुख उमेदवारांचे ‘हार्टबिट’
गणेश खवसे - नागपूर
अनुसूचित जाती (एस.सी.) साठी राखीव असलेल्या उमरेड विधानसभा मतदारसंघातून २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून ही जागा भारतीय जनता पक्षाने हिसकावली. सध्याची स्थिती पाहता एका पक्षाकडून दोन -तीन उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाने अधिकृतरीत्या एका उमेदवाराला समोर करताच इतर इच्छुक उमेदवार बंडखोरी करतील, हे निश्चित आहे. परिणामी उमरेडमध्ये बंडखोर उमेदवारांची संख्या वाढणार असून ते प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना जेरीस आणण्याची शक्यता अधिक आहे.
आगामी निवडणुकीत उमरेड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा सुधीर पारवे यांनाच उमेदवारी दिली जाणार असली तरी भाजपमध्ये अरविंद गजभिये हेसुद्धा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. इच्छुक काँग्रेस उमेदवारांची यादी लांबच लांब आहे. काँग्रेसकडून राजानंद कावळे, डॉ. शिरीष मेश्राम, संजय मेश्राम यांची नावे चर्चेत आहे.
यासोबतच भाजपकडे गेलेली ही जागा पुन्हा प्राप्त करण्यासाठी काँग्रेसने ऐनवेळी दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला ‘इम्पोर्ट’ करण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार जोपर्यंत ठरत नाही, तोपर्यंत येथील राजकीय समीकरण कसे राहील, हे सांगता येत नाही. भाजप - शिवसेना युती नसल्यास शिवसेनेकडून लोकसभेची तिकीट न मिळालेले राजू पारवे तयारीत आहे. युती राहिल्यास अपक्ष किंवा मोठ्या पक्षाच्या तिकिटवर ते नशीब आजमावताना दिसल्यास नवल वाटू नये.
आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे गेली असली तरी जर - तरच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलास झोडापे हे निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे. त्यांच्यासोबतच एक - दोघांची नावे समोर येत आहे. बहुजन समाज पक्षाची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत २३,६९३ मते बसपच्या किरण पाटणकर - रोडगे यांना या विधानसभा मतदारसंघातून मिळाली. त्यामुळे दमाचा उमेदवार बसपने येथून दिल्यास येथील लढत रंगतदार होईल, अशी स्थिती आहे.
याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गोंडवाना गणतंत्र पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चासह इतर पक्षांनीही कंबर कसली आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता अपक्ष उमेदवारालाही येथून संधी मिळाली आहे.
या मतदारसंघाचा १९८० पासून आढावा घेतला असता या मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा राहिला. एकदा अपक्ष आणि २००९ मध्ये भाजप वगळता काँग्रेस उमेदवार येथून विजयी झाले. १९८० मध्ये काँग्रेसचे भाऊसाहेब मुळक, १९८५ मध्ये अपक्ष म्हणून लढलेल्या भाऊसाहेब मुळक यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्या निवडणुकीत काँग्रेस (एस)चे डॉ. श्रावण पराते हे विजयी झाले. त्यानंतर १९९० आणि १९९५ मध्ये पराते विजयी झाले. मात्र १९९९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार वसंतराव इटकेलवार यांच्याकडून तब्बल २५ हजार ४१५ मतांनी त्यांचा पराभव झाला. २००४ मध्ये राजेंद्र मुळक यांच्या रूपात पुन्हा काँग्रेसला ही जागा प्राप्त झाली. मात्र २००९ च्या निवडणुकीत ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मुळक यांना मतदारसंघ सोडावा लागला. काँग्रेसने डॉ. शिरीष मेश्राम यांना तर भाजपने जिल्हा परिषद सदस्य असलेल्या सुधीर पारवे यांना निवडणुकीत उमेदवार म्हणून समोर आणले. त्यात सुधीर पारवे हे विजयी झाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. ते कामही अंतिम टप्प्यात आले आहे.