लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा सामना तेथे रंगताना दिसून येत आहे. विविध वृत्तवाहिन्यांनी ओपिनियन पोल समोर आणले असून या सर्वांची सरासरी काढली असता तृणमूलची घसरगुंडी व भाजपचा फायदा असे चित्र दिसून येत आहे. डावे पक्ष व काँग्रेसच्या आघाडी स्पर्धेतही नसणार असल्याचे अंदाज यातून वर्तविण्यात आले आहे.
मतदारांच्या मनातील कल जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या विविध ओपिनियन पोलची आकडेवारी गोळा करून त्या आकडेवारीच्या विश्लेषणातून एका वृत्तवाहिनीने महाओपिनियन पोल मांडला आहे. २०१६ च्या निवडणुकीत तृणमूलला २११ व भाजपला अवघ्या ३ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाओपिनियन पोलनुसार भाजपला सरासरी १३८ जागा मिळतील, तर तृणमूलला १३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २९४ च्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत बहुमतासाठी १४८ चा आकडा आवश्यक आहे. अशा स्थितीत दोन्ही पक्षांमध्ये बहुमतासाठी चढाओढ असेल.
भाजपा पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, तर ममता बॅनर्जींचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहील. या महाओपिनियन पोलसाठी वापरण्यात आलेल्या विविध ओपिनियन पोलची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
ओपिनियन पोल - भाजप - तृणमूल - काँग्रेस व डावे
पीपल्स प्लस - १८३ - ९५ - १६
सीएनएक्स - १३५ - १४१ - १८
टाइम्स नाऊ - सी व्होटर - ११२ - १६० - २२
टीव्ही ९ - पोलस्ट्रॅट - १२२ - १४६- २३