भाजप-काँग्रेस सारखेच : श्रीहरी अणे यांचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 20:56 IST2019-04-04T20:53:55+5:302019-04-04T20:56:23+5:30
काँग्रेस कमकुवत असल्याचे भाजप सांगत आहे. कॉंग्रेसही भाजपला प्रत्युत्तर देत नाही. दोन्ही पक्ष परस्पर विरोधी भूमिका घेण्यास टाळत आहेत. भाजप-कॉंग्रेसकडे कोणताच मुद्दा निवडणूक लढविण्यासाठी नसल्यामुळे ही पहिलीच बिनमुद्याची निवडणूक आहे. हे दोन्ही पक्ष साररखेच असल्यामुळे अॅड. सुरेश माने यांना विदर्भाच्या मुद्यावर रिंगणात उतरवावे लागले, असा हल्लाबोल विदर्भ निर्माण महामंचचे नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.

पत्रकार परिषदेत बोलताना विदर्भ निर्माण महामंचचे अॅड श्रीहरी अणे, शेजारी अॅड वामनराव चटप, नागपूर लोकसभा मतदार संघाचे विदर्भ निर्माण महामंचचे उमेदवार अॅड सुरेश माने, सुनिल चोखारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेस कमकुवत असल्याचे भाजप सांगत आहे. कॉंग्रेसही भाजपला प्रत्युत्तर देत नाही. दोन्ही पक्ष परस्पर विरोधी भूमिका घेण्यास टाळत आहेत. भाजप-कॉंग्रेसकडे कोणताच मुद्दा निवडणूक लढविण्यासाठी नसल्यामुळे ही पहिलीच बिनमुद्याची निवडणूक आहे. हे दोन्ही पक्ष साररखेच असल्यामुळे अॅड. सुरेश माने यांना विदर्भाच्या मुद्यावर रिंगणात उतरवावे लागले, असा हल्लाबोल विदर्भ निर्माण महामंचचे नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.
अॅड. अणे म्हणाले, विदर्भाच्या मुद्यावर फसविल्यामुळे मतदारांनी कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर काढले. भाजपने विदर्भाच्या मुद्याचे भांडवल करून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढविली. मात्र, सत्ता मिळताच त्याच मुद्याला भाजप विसरला. विदर्भ निर्माण महामंच विधानसभेत २० ते ३० वयोगटातील उमेदवारांना, महिलांना प्राधान्य देणार आहोत. तेलंगणासारखे आंदोलन करा आम्ही दखल घेऊ असे गडकरींनी सांगितले होते. परंतु आम्हाला जाळपोळ, रक्तपात नको आहे. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून भाजप मते मागत आहे. कॉंग्रेसही नागपुरात बाहेरचा उमेदवार आणून लाजेखातर निवडणूक लढवित आहे. परंतु विदर्भ निर्माण महामंचाचे अॅड. सुरेश माने हे विदर्भाच्या मुद्यावर निवडणुकीत उभे आहेत. केवळ नागपूर-मुंबई महामार्ग, मेट्रो म्हणजे विकास नाही. विदर्भातील शेतकरी, त्यांचे प्रश्न, बेरोजगारी, आदिवासीवरील अत्याचार, विदर्भातील सरकारची असफल ठरलेली क्षमता यावर महामंच निवडणूक लढवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अॅड. वामनराव चटप यांनी आम्ही निवडणुकीकडे आंदोलन म्हणून पाहत असल्याचे सांगितले. तर अॅड. माने यांनी विदर्भ वेगळा झाल्यास विकासाचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा केला. या वेळी सुनील चोखारे उपस्थित होते.