बुटीबोरी येथील कारवाईचे भिवापूर कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST2021-09-03T04:08:50+5:302021-09-03T04:08:50+5:30
भिवापूर : वाघांच्या दातांची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना गत २७ ऑगस्ट रोजी नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील एका ढाब्यावर अटक करण्यात आली. ...

बुटीबोरी येथील कारवाईचे भिवापूर कनेक्शन
भिवापूर : वाघांच्या दातांची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना गत २७ ऑगस्ट रोजी नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील एका ढाब्यावर अटक करण्यात आली. यातील चारपैकी दोन आरोपी अभयारण्य प्रभावित भिवापूर तालुक्यातील आहेत. बुटीबोरी येथील कारवाई करणाऱ्या वन विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) सकाळच्या सुमारास शहरातील पुन्हा एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. बुटीबोरी कारवाईचे हे भिवापूर कनेक्शन एक ना अनेक प्रश्न उभे करणारे आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारावर नागपूर वन विभाग व बुटीबोरी वन परिक्षेत्र विभागाच्या संयुक्त पथकाने गत २७ ऑगस्ट रोजी सापळा रचून नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील अपना पंजाब ढाबा येथून वाघांच्या दातांसह परसराम नंदू बिजवे (३६, रा. तास), गणेश देविदास रामटेके (२८, रा. बोर्डकाल (दोघेही रा. ता. भिवापूर), विजय हरीभाऊ वाघ (३२) बुटीबोरी, दिक्षानंद दिलीप राऊत रा. मसाळा यांना अटक केली होती. त्यांच्याकडून एम.एच.- ४० ए.डी.-९१५२ व एम.एच.-४०- ए.डबल्यू.-२७८३ या दोन दुचाकीही जप्त करण्यात आल्या होत्या. या चारही आरोपींपैकी परसराम बिजवे व गणेश रामटेके हे भिवापूर तालुक्यातील आहेत. हे दोघेही घटनेच्या दिवशी एकाच दुचाकीने बुटीबोरी येथे गेले होते. भिवापूर तालुका जंगलव्याप्त आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा अर्ध्याहून अधिक भाग भिवापूर तालुक्यातीलच आहे. त्यामुळे परिसरात वाघ, बिबटे व इतर वन्य प्राण्यांचा कायम मुक्त संचार असतो. यापूर्वी तालुक्यात वाघ, बिबट्याची शिकार आणि तस्करीच्या अनेक घटना उजेडात आल्या आहे. या तस्करीत स्थानिक आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला आहे. अशात बुटीबोरी येथील कारवाईत पुन्हा भिवापूर तालुक्याचे कनेक्शन जुडल्याने खळबळ उडाली आहे. वाघांच्या दातांची तस्करी असल्यामुळे आरोपींनी किंवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींनी कुठेतरी वाघाची शिकार केली यात शंका नाही. मात्र, ही शिकार कुठे आणि कोणी केली, या तस्करीतील वाघांच्या दातांचे थेट कऱ्हांडला अभयारण्याशी तर संबंध नाही ना, याचा शोध घेणे आवश्यक आहे. असे असल्यास आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
अधिकारी सकाळीच भिवापुरात
२७ ऑगस्ट रोजी बुटीबोरी येथे वाघांच्या दातांसह चार आरोपींना अटक केल्यानंतर प्रथम न्यायदंडाधिकारी, नागपूर यांनी ३ सप्टेंबर पर्यंत आरोपींना वन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर बुधवारी (दि.१) सकाळी ६ वाजताच्या सुमारास बुटीबोरी वन विभागाचे पथक भिवापूर येथे धडकले. या पथकाने शहरातील अन्य एकास चौकशीसाठी ताब्यात घेत त्याला बुटीबोरी येथे घेऊन गेले. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये नोंदही करण्यात आली आहे.
-
आरोपीची संख्या वाढणार?
या कारवाईत सध्या केवळ वाघांचे दात वन विभागाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे वाघाची शिकार कुठे झाली, कातडे, नखे, मिशा आदींचा शोधही वन विभाग घेत आहे. महत्त्वाचे म्हणजे शिकार ते तस्करी या संपूर्ण प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून यात भिवापूर शहरातील आणखी दोघांवर वनविभागाची नजर असल्याची चर्चा आहे. या कारवाईमुळे शहरातील काहींच्या हालचालीसुध्दा संशयास्पद आहेत.
-
गेला ‘जय’ कुणीकडे?
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ नामक वाघाने जगभरातील पर्यटकांना भुरळ घातली होती. हाच भारदस्त देखणा ‘जय’ अचानक बेपत्ता झाला. राज्यात आणि बाहेरराज्यातही शोध घेतला गेला. मात्र, तीन ते चार वर्षांचा कालखंड उलटूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात अशा एक ना अनेक संशयास्पद घटना घडल्या. त्यामुळे बुटीबोरी येथील तस्करीच्या घटनेने कऱ्हांडला अभयारण्याकडेही बोट दाखविले जात आहे.