पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा केंद्रीय पथकासमाेर आक्राेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST2020-12-25T04:07:43+5:302020-12-25T04:07:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी/माैदा/पारशिवनी : ऑगस्टमध्ये कन्हान व पेंच नदीला आलेल्या पुरामुळे कामठी तालुक्यातील साेनेगाव (राजा) गावाला जबर फटका ...

पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा केंद्रीय पथकासमाेर आक्राेश
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी/माैदा/पारशिवनी : ऑगस्टमध्ये कन्हान व पेंच नदीला आलेल्या पुरामुळे कामठी तालुक्यातील साेनेगाव (राजा) गावाला जबर फटका बसला हाेता. केंद्रीय पथकाने गुरुवारी (दि. २४) या गावासह पारशिवनी व माैदा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यात साेनेगाव (राजा) येथील पूरग्रस्तांनी आक्रमक हाेत गावाचे पुनर्वसन करण्याची तसेच त्यासाठी शासनाने घरबांधकामाला जागा व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी रेटून धरली हाेती.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मध्य प्रदेशात अतिवृष्टी झाल्याने कन्हान व चाैराई धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पेंच नदीला माेठा पूर आला हाेता. पेंच नदी कन्हान नदीत बिना संगम येथे विलीन हाेत असल्याने या पुराने साेनेगाव (राजा)ला चारही बाजूंनी वेढले हाेते. या पुरामुळे साेनेगाव (राजा) येथील ५४ नागरिकांच्या घरांमधील जीवनावश्यक साहित्याच्या नुकसानासाेबतच ६४ घरांची पडझड झाल्याने माेठे नुकसान झाले हाेते. शिवाय, येथील २२५ हेक्टरमधील पिकांना पुराचा जबर फटका बसला हाेता.
शासनाने या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतही केली. मात्र, साेनेगाव (राजा)ला वारंवार पुराचा धाेका उद्भवत असल्याने या गावाचे पुनर्वसन करून ही समस्या कायमस्वरूपी साेडविण्याची मागणी जिजाबाई गजभिये (६०) यांच्यासह अन्य महिला व नागरिकांनी रेटून धरली हाेती. अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांशी चर्चा करीत त्यांना मिळालेल्या शासकीय मदतीबाबत विचारणा केली.
या पथकात केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, प्राधिकरणाचे सहसचिव रमेशकुमार घंटा, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य अभियंता महेंद्र सहारे, तुषार व्यास, उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार अरविंद हिंगे यांचा समावेश हाेता. यावेळी तहसीलदार दिनेश निंबाळकर, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड, मौद्याच्या मुख्याधिकारी कोमल कराळे, तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता मिलिंद बांधवकर, सहायक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए. एस. महाजन, ठाणेदार हेमंतकुमार खराबे, तालुका कृषी अधिकारी मंजूषा राऊत, नायब तहसीलदार रणजित दुसावार, सोनेगावचे सरपंच चंद्रकांत हेवट उपस्थित हाेते.
....
पुराचा धाेका कायम
कन्हान नदीच्या तीरावर असलेल्या साेनेगाव (राजा)ला दरवर्षी पुराचा फटका बसताे. सन १९९४ साली आलेल्या पुराने गावाला वेढले हाेते. तेव्हापासून येथील नागरिकांनी गावाच्या पुनर्वसनाची मागणी करायला सुरुवात केली. यासाठी शासनाने गावाशेजारी साडेपाच एकर जागा मंजूर केली व पट्टे देण्याची ग्वाही दिली. १७० कुटुंबीयांना अद्यापही पट्टे न मिळाल्याने त्यांनी मूळ गाव साेडले नाही.
...
नुकसान भरपाईची प्रतीक्षा
या पथकाने राहुल महल्ले यांच्या शेताची पाहणी केली. त्यांनी ते शेत ठेक्याने केले असून, पुरामुळे संपूर्ण पीक नष्ट झाले. शासनाकडून काेणतीही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पुरात मधुकर चौधरी यांची एक गाय वाहून गेली. त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही. नामदेव ढोले, बंडू चौधरी यांच्यासह इतरांनी पट्टे मिळवून देण्याची मागणी केली.
....
ब्रिटिशकालीन पुलाचे नुकसान
या पुरामुळे माथनी (ता. माैदा) शिवारातील ब्रिटिशकालीन पुलाचे माेठे नुकसान झाल्याने हा पूल चार महिन्यांपासून बंद केला आहे. त्यामुळे माथनी व चेहळी येथील नागरिकांना पाच किमीचा वळसा घेऊन माैद्याला यावे लागते. कन्हान नदीतील इन्टेक विहिरीतून माैदा शहराला पाणीपुरवठा केला जाताे. पुरामुळे या विहिरीचेही नुकसान झाले असून, साहित्य वाहून गेले. पथकाने पूल व विहिरीची पाहणी केली.
...
पूल गेला वाहून
पेंच नदीला आलेल्या पुरात पारशिवनी तालुक्यातील सालई-माहुली दरम्यानचा पूल वाहून गेल्याने तालुक्याचा रामटेक तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या पुलाचे बांधकाम २०१८ मध्ये १२ काेटी रुपये खर्च करून करण्यात आले हाेते. अधिकाऱ्यांनी या पुलासह सिंगारदीप व नीलज (खंडाळा) येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
...