शिक्षणक्षेत्रात खळबळ! अपात्र मुख्याध्यापक नियुक्तीप्रकरणात शिक्षण संस्थाचालकाला घेतले ताब्यात
By योगेश पांडे | Updated: June 6, 2025 22:19 IST2025-06-06T22:18:48+5:302025-06-06T22:19:15+5:30
शालार्थ आयडी घोटाळ्यातदेखील आणखी संस्थाचालकांवर संक्रांत

शिक्षणक्षेत्रात खळबळ! अपात्र मुख्याध्यापक नियुक्तीप्रकरणात शिक्षण संस्थाचालकाला घेतले ताब्यात
योगेश पांडे
नागपूर : बोगस दस्तऐवजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी भंडारा येथून ताब्यात घेतले. प्रकृतीच्या कारणावरून संस्थाचालकाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षणक्षेत्रात व विशेषत: संस्थाचालकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातही एसआयटीकडून संस्थाचालकांवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.
चरण नारायण चेटुले (६३, भंडारा) असे संबंधित संस्थाचालकाचे नाव आहे. चेटुले भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे राजश्री शिक्षण संस्था व नवोदय शिक्षण संस्था या दोन संस्थांमध्ये अध्यक्ष आहेत. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर, यादवनगरची बोगस व बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने राजश्री शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली. मुन्ना वाघमारेच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी या घोटाळ्यात पुडके, उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पुडकेच्या कागदपत्रांवर चोटुलेची स्वाक्षरी होती. पोलिसांनी याची खातरजमा केल्यानंतर गुरुवारी रात्री भंडाऱ्यातून चेटुलेला ताब्यात घेतले. त्यांची बायपास सर्जरी झाली असल्याने नागपुरात आणल्यावर अगोदर मेयो व त्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून सुटी मिळाल्यावर पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी न्यायालयासमोर पोलिस कोठडीची मागणी केली आहे.
वाढदिवसाच्या दिवशीच घेतले ताब्यात
चरण चेटुले यांचा गुरुवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आले. पुडकेच्या कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी होती. याअगोदर पोलिसांनी राजू केवलराम मेश्राम या एका संस्था सचिवालाही अटक केली होती.
इतर संस्थाचालक अस्वस्थ
दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभागी असलेले काही संस्थाचालक अस्वस्थ झाले आहेत. त्यांना एसआयटीकडून लवकरच चौकशीला बोलविण्यात येणार आहे. अनेक संस्थाचालकांपर्यंत ही माहिती जाताच त्यांचे धाबे दणाणले आहेत.